प्रतिनिधी / नागठाणे :
सातारा जिल्ह्यातील माथाडी कामगारांच्या अनेक मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत. त्या तातडीने मान्य करा अन्यथा जिल्ह्यातील माथाडी कामगार गुरुवारपासून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा महाराष्ट्र माथाडी श्रमजीवी कामगार व जनरल युनियनचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय निकम यांनी दिला आहे.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यात विविध आस्थापनेत आमच्या संघटनेचे माथाडी कामगार काम करत आहेत. सदर कामगारांच्या नोंदणी, मासिक वेतन माथाडी मंडळात भरणा करणे, वेतन वाढ, बोर्डाने नोंदीत केलेल्या कामगारांना मालकाने कामावर हजर न करून घेतल्याने आस्थापणेची जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत रिकव्हरी चालू करणे, टोळी विभाजन, टोळी वाढ करणे, कामगारांचे राजीनामे यांसारखी अनेक कामे माथाडी मंडळात प्रलंबित आहेत. वेळोवेळी फोन करून सुद्धा फोन घेण्यास मंडळाचे अधिकारी टाळाटाळ करत आहेत.
ही सर्व कामे गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित असून, त्यावर लवकरात लवकर निर्णय न झाल्यास सभासद माथाडी कामगार व माथाडी मंडळाच्या नोंदीत कामगारांकडून गुरुवार 1 जुलै पासून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निकम यांनी दिला आहे.