सैन्य भरतीसाठी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम
प्रतिनिधी / कोल्हापूर
सैन्य भरती सुरु करण्याबाबत राज्य सरकारने योग्य अहवाल केंद्र सरकारला द्यावा. यासाठी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम देत आहे. अन्यथा दुसर्या टप्प्यातील आंदोलन सुरु होऊन प्रसंगी मंत्रालयावर धडक देऊ, असा इशारा शुक्रवारी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला. दरम्यान सैन्य भरतीसाठी वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवावी, यासह विविध मागण्यांसाठी भरतीसाठी तयारी करत असलेल्या तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
दसरा चौक येथे सकाळी दहापासून जिल्ह्याच्या कानाकोपर्यासह सांगली जिह्यातून भरतीची तयारी करत असलेले तरुण जमायला सुरुवात झाली. दुपारी बाराच्या सुमारास आ. सदाभाऊ खोत या ठिकाणी आले. यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन आ. खोत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. जय जवान...जय किसान',
सैन्य भरती झालीच पाहीजे’ अशा घोषणा देत तरुणांचा हा मोर्चा व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले.
आ. सदाभाऊ खोत म्हणाले, कोरोनाच्या संकटाशी सामना करणारा ग्रामीण भागातील तरुण शेतकरी देशसेवा करण्यास सज्ज झाला आहे. दहावी व बारावी पास झाल्यानंतर सैन्य भरतीसाठी तरुण पाच ते सहा वर्षे मेहनत करत आहेत. परंतु गेल्या दोन वर्षात भरतीच न झाल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. वय वाढल्यावर भरतीस पात्र राहता येत नाही. त्यामुळे केलेली सर्व मेहनत वाया जाईल. त्यामुळे सरकारने वयोमर्यादा वाढवावी.
ते पुढे म्हणाले, सैन्य भरतीबाबत राज्य सरकारने 15 दिवसात केंद्र सरकारला योग्य अहवाल द्यावा. अन्यथा दुसर्या टप्प्यातील आदोंलन तीव्र करुन प्रसंभी मंत्रालयावर धडक मारु. राज्य सरकारने आता जावे व्हावे, कारण महाराष्ट्रातील तरुणांचा वणवा पेटल्यास सरकार उलथल्याशिवाय राहणार नाही.
आंदोलक विशाल घराळ (वडगाव, ता. हातकणंगले) व आकाश पाटील (भडगाव, ता. गडहिंग्लज) या तरुणांनी वयोमर्यादा वाढत चालली आहे, त्यामुळे भरतीसाठी वयोमर्यादा वाढवावी व लवकरात लवकर भरती सुरु करावी, अशी मागणी केली.
दरम्यान आ. खोत यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन निवेदन सादर करुन चर्चा केली. यावेळी या मागण्यांबाबत सरकारला कळविले जाईल असे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. तसेच डिसेंबरमध्ये होणार्या भरतीसाठी शिवाजी विद्यापीठ मैदानावर नियोजन करण्याची परवानगी विद्यापीठ प्रशासनाकडे मागितली असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. आंदोलनात सागर खोत, आनंदराव पवार, राहुल पाटील, आण्णासाहेब काकडे, मोहसिन पटवेकर, लालासाहेब धुमाळ यांच्यासह तरुण सहभागी झाले होते.