गेली अनेक वर्षे नोकरीत धावपळ, दगदग, कामाचे वेळापत्रक व त्याप्रमाणे आमचा चालणारा नेहमीचा गाडा धावतोय की काय, असे वाटायचे. तरीसुध्दा नोकरीत असल्याने हक्काच्या मिळणाऱया सुट्टय़ातील कामांचे काटेकोरपणे असलेले नियोजन, यामुळे चाकोरीबाहेर घरी मुलाला (लहानपणापासून) जादा वेळ देता आला नव्हता. म्हणून आता तरी त्याच्या व कुटुंबाच्या आवडी-निवडीचे खाऊपिऊ करुन द्यावेत, असे ठरवले.
मुळात मला समज आल्यापासून आईकडून चांगले व विविध पदार्थ कसे करावेत, मग ते गोड असोत, तिखट किंवा तळलेले, वाळवलेले असोत अशा गोष्टी मी शिकले होते. मात्र नोकरीत गुंतल्यानंतर वेळेअभावी हे सर्व करता येत नव्हते. अचानक टिव्हीवर बातमी आली की, कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन जाहीर झाला व सर्व थांबल्यासारखे वाटले. कोरोनाच्या सारख्या बातम्या बघून मन सुन्न होत होते. देशात कर्फ्यू असल्याने बाहेर कुठेही बाहेर जायचे नाही. शाळा वगैरे बंद असे नियम घातल्यावर मी घरच्या काही कामांचे थोडे नियोजन करुन आतापर्यंत अपूर्ण राहिलेल्या आवडी-निवडी पुऱया करुया, असे ठरवले.
त्याचदरम्यान कर्मचारी म्हणून माझ्या कार्यक्षेत्रातील कोरोना-कुटुंब सर्वेक्षण करण्याचेही काम वरिष्ठांनी मला दिले. त्याचेही योग्य नियोजन करुन अशा कोरोना या जागतिक आपत्ती काळातील काम अगदी यशस्वीपणे पूर्ण करुन दिले व माझ्या ठरलेल्या कामांकडे वळून, पावसाळय़ासाठी धान्य वाळवणे, फेण्या करणे, साबुदाणा चकल्या व इतर वस्तू वाळवणे तसेच किचनमधील वेगवेगळे पदार्थ करताना कधी बटाटे वडे तर कधी साबुदाणे वडे, चिवडा लाडू, फणस भाजी, ओले काजूगर भाजी, कैरीचे लोणचे पन्हे, चटणी, मिसळ, फालूदा, गाजर हलवा अशासारखे पदार्थ आवडीने करुन कुटुंबाला खाऊ घातले. या सुट्टीमुळे नातेवाईक, सहकारी, मैत्रिणी यांना सवडीने फोन करुन चौकशी करत असते. कारण एका बाजूला कोरोना कर्फ्यू असताना कुटुंबातील व्यवस्था, सहकार्य, एकमेकांनी प्रत्येकास मदत करुन प्रत्येकजण काळजी घेऊ लागलाय. लॉकडाऊनमुळे सकारात्मक परिणाम दिसू लागलाय. घरकामाबरोबर शाळेची ‘वर्क फॉर्म होम’ याप्रमाणे सर्व काही प्लॅनिंग, रेकॉर्ड, माहिती देणे इत्यादी कामे निवांतपणे चालू आहेत.
कोरोनाचे संकट लवकर संपावे!
या सुट्टीत मनासारख्या गोष्टी करता आल्या. पण कोरोना प्रसाराची कायम चिंता वाटते. हे संकट लवकर संपावे म्हणून परमेश्वराकडे प्रार्थनाही करते व केव्हा शाळा सुरु होते, याची वाट पाहतेय.