कणकवली / प्रतिनिधी
कणकवली शहरात त्यांचा रहिवास असला तरीही विजे सारख्या मूलभूत गरजे पासून ते वंचितच होते. महसूल विभागाने सातबाराच्या इतर हक्कांमध्ये त्यांची नावे नोंदवली अन् आठ दिवसातच महावितरणने त्यांच्या घरी दिवाळीच्या आनंदाचा अनुभव प्रत्ययास आणून दिला. शहरातील सात आदिवासी कातकऱ्यांच्या घरी 26 जानेवारी चे औचित्य साधत वीजपुरवठा सुरू करण्यात आला. विशेष म्हणजे महावितरणच्या कणकवली विभागीय कार्यालयाच्या अधिकारी मंडळीनी पुढाकार घेत स्वखर्चाने वीजपुरवठा सुरू करून देत आदिवासीं कातकरी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला.
गेल्या अनेक वर्षांपासून कणकवली शहरातील गणपती सणा येथे आदिवासी कातकरी बांधवांची काही घरे आहेत. जवळपास दोन पिढ्या याच ठिकाणी राहतात. मात्र त्यांची झोपडीवजा घरे असलेल्या जागा त्यांच्या नावे नाहीत. मध्यंतरी राज्यपालांच्या आदेशानुसार दुसऱ्याच्या सात बारात अशा प्रकारची झोपडीवजा घरे असलेल्या आदिवासी कातकरी बांधवांची नावे सातबारावरील इतर हक्कात नोंद करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या. त्यानुसार कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर. जे. पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेत तालुक्यातील कणकवली सहित फोंडा, करंजे, हरकुळ बुद्रुक येथे आदिवासी कातकरी बांधवांची असलेल्या घरांच्या मालकांचा सात-बारावर इतर हक्कात नाव नोंदणीचा कार्यक्रम पूर्ण केला. अशाप्रकारे तालुक्यातील सुमारे 24 घराची नोंद करण्यात आली. हा वीजपुरवठा सुरू करताना अतिरिक्त कार्यकारी अभियंता गिरीश भगत, सागर कांबळे श्री. माने यांच्यासह इतर कातकरी बांधव उपस्थित होते.