उंटाच्या मृत्यूमुळे अनेकांना अशू अनावर : हिंडाल्को फॅक्टरीनजीक माळरानावर केले दफन
प्रतिनिधी / बेळगाव
प्रयत्नांची शर्थ करूनही उपचाराचा उपयोग न होता अखेर त्या उंटाने प्राण सोडले आणि तांडय़ातील उंट मालकाच्या डोळय़ांतून अश्रू वाहू लागले. लॉकडाऊनमुळे जशी अनेकांची परवड सुरू आहे, तशीच स्थलांतरितांचीही सुरू आहे. बेळगावमध्ये हिंडाल्को पुलाच्या खाली उंटमालक उंटांसह राहत असून लॉकडाऊनमुळे ते बेळगावलाच अडकून पडले आहेत.
लॉकडाऊची घोषणा होण्यापूर्वी शहरात सर्वत्र फिरून त्यांनी उंटावरून मुलांना फिरवत त्यांचे मनोरंजन केले. येथे काही दिवस मुक्काम करून पुढच्या गावी जाण्याचा त्यांचा विचार होता. परंतु लॉकडाऊनने त्यांची कोंडी केली आणि ते येथेच अडकून पडले. दुर्दैवाने त्यांची कमाई थांबली आणि स्वतःचे आणि त्यापेक्षाही उंटांचे पोट भरणे यांची चिंता त्यांना भेडसावू लागली.
याबाबतचे सविस्तर वृत्त ‘तरुण भारत’ने दिल्यानंतर अनेक संस्था, संघटनांनी त्यांना मदत केली. परंतु उंटांना चारा मिळणे कठीण झाले. नाईलाजाने तांडा चालकांनी उंटांना एरंडेलची पाने खाऊ घालण्यास सुरुवात केली. दरम्यान त्यातील एक उंट आजारी पडला. याची दखल घेऊन ‘माझा धर्म पशु बचाव’च्या सदस्यांनी मंगळवारी काकती येथील पशुवैद्यकीय खात्याच्या मदतीने त्या उंटावर उपचार केले. माध्यमांनी हे वृत्त प्रसारित करताच प्रत्येक जण हळहळला. दुर्दैवाने बुधवारी तो उंट मरण पावला.
उंट मृत झाल्याचे लक्षात येताच माझा धर्म पशु बचाव संघटनेचे प्रमुख विनायक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कलामुद्दीन शहा व आशिष कोचेरी यांनी पुलाच्या ठिकाणी जाऊन मदतकार्य हाती घेतले. जेसीबी मागवून त्यामध्ये मृत उंटाला ठेवून हिंडाल्को फॅक्टरीनजीकच्या माळरानावर दफन केले. यावेळी बजरंग दलाचे कार्यकर्ते नरेश शिंदे, गंगाराम नाईक, राजकुमार पाखरे, मदन, विशाल हुंद्रे उपस्थित होते.
आम्हाला आमच्यापेक्षा आमच्या उंटांची काळजी अधिक आहे. परंतु त्यांना आमच्या गावी घेऊन जायचे झाल्यास किमान 20 हजार रुपये खर्च येणार आहे. कारण उंटांना ट्रकमध्ये घालून न्यावे लागणार आहे, असे उंटमालकांचे म्हणणे आहे.