पुण्याचे वैभव असलेल्या शनिवार वाड्याचा 288 वा वर्धापनदिन साजरा
ऑनलाईन टीम / पुणे :
रांगोळीच्या पायघडय़ा सनई-चौघडय़ांचे सूर आणि हार तोरणांनी सजविलेला पुण्याची शान असलेल्या शनिवार वाड्याचा भव्य दिल्ली दरवाजा अशा मंगलमयी वातावरणात शनिवार वाडय़ाचा 288 वा वर्धापनदिन साजरा झाला.
ऐतिहासिक शनिवार वाडय़ाची वास्तू न्याहाळात आपला पराक्रमी इतिहास पुणेकरांच्या नजरेसमोर तरळला. ऐतिहासिक शनिवार वाडय़ाचा इतिहास मनात आठवत असतानाच शनिवार वाडय़ाचा दिल्ली दरवाजा पुणेकर आणि पर्यटकांसाठी पूर्णपणे खुला करण्यात आला.
थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे शनिवार वाडय़ाच्या 288 व्या वर्धापनदिनानिमित्त शनिवार वाडय़ात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ इतिहास तज्ञ मोहन शेटे यांनी शनिवार वाडय़ाच्या आणि पेशव्यांच्या गौरवशाली इतिहासाची माहिती उपस्थितांना दिली. पेशवे यांचे वंशज श्रीमंत उदयसिंह पेशवा, उपमहापौर सरस्वती शेंडगे, प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे, श्रीकांत नगरकर, चिंतामणी क्षीरसागर, उदय वाडदेकर, अनिल नेने, प्रकाश दाते, मकरंद माणकीकर, उमेश देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे व श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली.
मोहन शेटे म्हणाले, या जागेवर 10 जानेवारी 1730 रोजी भूमीपूजन झाले होते आणि त्यानंतर 22 जानेवारी 1732 रोजी शनिवार वाडय़ाची वास्तूशांत झाली. अनेक वर्षांनी हा दिल्ली दरवाजा उघडण्यात आला आहे आणि अनेक आठवणी मनात येत आहेत. शनिवार वाडय़ासारख्या भव्य वास्तू महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये अनेक असतील परंतु या वास्तुसमोर जो पराक्रम घडला आहे, त्या पराक्रमाची तुलना करता येणार नाही. सतत 80 वर्ष भारतावर प्रभुत्व निर्माण करण्याचे काम या वाड्याने केले होते, ही अभिमानाची गोष्ट आहे. आज पानिपतच्या रणसंग्रामाची देखील आठवण होत आहे. पानिपतच्या युध्दात मराठे लढले, आपल्या मातीची लाज राखण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करण्यासाठी. अशा पराक्रमाचा इतिहास या वाडय़ाला लाभलेला आहे.
उदयसिंह पेशवा म्हणाले, काहीजण एकत्र येऊन शनिवार वाडय़ाचा वाढदिवस साजरा करतात ही आनंदाची गोष्ट आहे. शनिवार वाडा आणि पेशवाईला मराठी लोक विसरून गेले आहेत. वाड्याची स्थिती फारशी चांगली नाही. सरकारचे शनिवार वाड्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यामध्ये सुधारणा झाल्यास अनेक पर्यटक ते पाहण्यासाठी येतील. बाकीच्या वास्तूंवर ज्याप्रमाणे सरकार खर्च करते आहे. तसेच शनिवार वाडय़ाची डागडुजी करून त्यावर देखील खर्च केला पाहिजे. कारण शनिवार वाडा पुण्याचे, महाराष्ट्राचे भूषण आहे, असेही त्यांनी सांगितले.