दोघा जणांना पोलीस कोठडी, फरारी आरोपी केरळमध्ये?
प्रतिनिधी/ बेळगाव
हुबळी येथील युवकाच्या अपहरण प्रकरणाची पाळेमुळे मिरज-सांगलीपर्यंत पोहोचली असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी दोघा जणांना पोलीस कोठडीत घेतले आहे. अद्याप चौघेजण फरारी असून त्यांनी केरळमध्ये आश्रय घेतल्याचा संशय आहे. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी पोलिसांनी आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे. यापैकी कदमेरसुल आसीम खाजी (वय 27, रा. रेलनगर, बेळगाव) व याहीया जाकरीया कटगेरी (वय 23, रा. पिरनवाडी) या दोघांना न्यायालयाची परवानगी घेऊन पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिघा जणांना बेळगावात तर पाच जणांना गोव्यात अटक करण्यात आली आहे. आणखी चौघेजण फरारी आहेत. पोलीस आयुक्तांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. फरारी आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. दिवसाढवळय़ा रिव्हॉल्वरचा धाक दाखवून अपहरण करणाऱया टोळीतील संशयितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात येत आहे.
रवीकिरण नागेंद्र भट्ट (वय 34, रा. हुबळी) या युवकाचे 14 जानेवारी रोजी अपहरण करण्यात आले होते. उपलब्ध माहितीनुसार मिरज येथील शहानवाज चमन शेख, त्याचा भाऊ अज्जू, आझमनगर येथील त्यांचा नातेवाईक युनुस खाजी व सांगली येथील अभिषेक शेट्टी या चौघा जणांनी बेळगाव येथील तरुणांना सांगून रवीकिरण यांचे अपहरण करण्यास भाग पाडले आहे.
अपहरणानंतर तीन कोटी रुपये खंडणी मागण्यात आली होती. खानापूरजवळील एका पोल्ट्री फार्ममध्ये खुर्चीला हात-पाय बांधून रवीकिरण यांना कोंडून ठेवण्यात आले होते. त्यांनी कसेबसे स्वतःची सुटका करून घेऊन गाव गाठले. त्याचवेळी रवीकिरण यांच्या पत्नीने शहानवाजला ही गोष्ट सांगितली. त्यावेळी तुमची कार सदाशिवनगर-बेळगाव येथे आहे, ती घेऊन जा, असा निरोप दिला.
खरे तर शहानवाजला ही गोष्ट कशी कळली? याचा सुरुवातीला उलगडा झाला नाही. कार आणण्यासाठी रवीकिरण व त्यांची पत्नी बेळगावला आले. त्यावेळीही पुन्हा त्यांचा अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. लोक जमल्यामुळे अपहरणकर्त्यांनी त्यांना सोडून तेथून पलायन केले. त्यावेळी शहानवाज बेळगावातच होता. रवीकिरण यांना मदत केल्यासारखा त्याने आव आणला. हुबळीपर्यंत या दाम्पत्याला सोडूनही आला.
शहानवाज व त्याच्या भावानेच खंडणी उकळण्यासाठी रवीकिरण यांचे अपहरण करण्याचा कट रचल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. यासंबंधी वरि÷ पोलीस अधिकाऱयांशी संपर्क साधला असता शहानवाज व त्याचा भाऊ मिरज येथे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असली तरी पोलीस पथकाला मिरज व सांगली परिसरात त्यांचा ठावठिकाणा सापडला नाही. सध्या ते केरळमध्ये असल्याचा संशयही आहे, असे अधिकाऱयांनी सांगितले.