लोकांना टोप्या घालून त्यांच्याकडून पैसा उकळणारी पडद्यावरची बंटी आणि बबली ही जोडी 16 वर्षापूर्वी खूपच हिट झाली होती. ही स्टोरी इतकी गाजली की प्रत्यक्षात एखाद्या कपलने असे गुन्हे केले आणि ती जोडी पोलिसांच्या हाती लागली तर पेपरमध्ये येणाऱया हेडलाईनमध्येही बंटी बबली असा प्रतिकात्मक उल्लेख असायचा. अभिनेत्री राणी मुखर्जीने बबलीला आणि अभिनेता अभिषेक बच्चनने बंटीला असे काही साकारले, की 16 वर्षानंतरही हा सिनेमा लक्षात राहतो. राणी अभिषेकची रिलेशनशीप तेव्हा फॉर्मात होतीच, त्यात त्यांच्या केमिस्ट्रीने कमाल केली. आता पुन्हा बंटी आणि बबलीविषयी इतकं बोलण्याचे कारण म्हणजे या सिनेमाचा सिक्वेलमध्ये बबलीच्या भूमिकेत राणी असली तरी बंटीच्या रूपात अभिषेकच्या ऐवजी सैफ अली खानची वर्णी लागलीय. त्यामुळे साहजिकच अभिषेक सिनेमात का नाही, हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला नसता तरच नवल. पण अभिषेकला या सिनेमाच्या शूटिंगच्या तारखांच्या काळात वेळ नसल्याने त्याला बंटी साकारता आला नाही. खरं तर बंटी और बबलीच्या टीमला अभिषेकसोबत काम करायचे होते. या सिक्वेलमध्ये अभिषेक असावा, अशी टीमची इच्छाही होती. पण अभिषेकच्या प्रीप्लॅनमुळे ते शक्य झाले नाही आणि मुळातच बंटी और बबलीचा सिक्वेल पडदय़ावर यायला 16 वर्षे लागली. आधीच उशीर झाल्यामुळे अभिषेकच्या तारखांसाठी थांबायला प्रॉडक्शन टीमला वेळ नव्हता. पण अभिषेकची काही हरकत नाही म्हटल्यावर सैफचे नाव पुढे आले. अभिषेकनेच कारण सांगितल्याने गैरसमजांच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
एकतर ‘हम तुम’ सिनेमात राणी आणि सैफची केमिस्ट्री प्रेक्षकांनी पाहिली आहे. तरीही पहिल्या शॉटवेळी राणीच्या मनात खूपच धाकधूक होती, पण सैफने बंटीच्या भूमिकेचे धनुष्य चांगलेच पेलले.