विश्वचषक तिरंदाजी स्टेज 3 ः भारताचे दुसरे पदक निश्चित, राय-अंकिताचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ पॅरिस
वर्ल्ड कप स्टेज 3 तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी दुसरे पदक निश्चित केले असून अभिषेक वर्मा व ज्योती सुरेखा वेन्नम यांनी मिश्र कंपाऊंड सांघिक प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे.
दीपिका कुमारी व तिच्या सहकाऱयांनी महिलांच्या सांघिक रिकर्व्ह प्रकारात अंतिम फेरी गाठून भारताचे पहिले पदक निश्चित केल्यानंतर शुक्रवारी अभिषेक व ज्योती यांनी भारतासाठी दुसरे यश मिळविले. त्यांनी एकतर्फी झालेल्या उपांत्य लढतीत इस्टोनियाच्या रॉबिन जातमा व लिझेल जातमा यांच्यावर 156-151 अशी मात केली. वर्मा-ज्योती यांची सुवर्णपदकाची लढत पाचव्या मानांकित फ्रान्सच्या जोडीविरुद्ध आज शनिवारी होईल. सात महिन्यांच्या खंडानंतर पुनरागमन करणाऱया जागतिक तिसऱया मानांकित ज्योतीने वैयक्तिक गटातही उपांत्य फेरी गाठत पदकाच्या दिशेने वाटचाल केली आहे. ज्योतीला उपांत्यपूर्व फेरीत लिझेलकडून कडवा प्रतिकार झाला होता.
मात्र मिश्र सांघिक प्रकारात लिझेल व रॉबिन यांना भारतीय जोडीवर अपेक्षित दबाव आणता न आल्याने भारतीय जोडीने पहिल्या फेरीत बाजी मारली. हेच सातत्य कायम ठेवत वर्मा-ज्योती यांनी तिसऱया फेरीनंतर प्रतिस्पर्धी जोडीवर पाच गुणांची आघाडी घेतली आणि हीच शेवटी निर्णायक ठरली. या फेरीच्या अंतिम सेटमध्ये त्यांनी 38-38 अशी बरोबरी साधली तरी लिझेल-रॉबिन यांना त्याचा लाभ झाला नाही.
उपउपांत्यपूर्व फेरीत भारतीय जोडीला बाय मिळाल्यानंतर तिसऱया मानांकित भारताने मिश्र सांघिक प्रकारातील मोहिम प्युर्टो रिकोविरुद्ध आठ गुणांच्या फरकाने (158-150) विजय मिळवित सुरू केली. उपांत्यपूर्व फेरीत वर्मा-ज्योती यांना सर्वात कडवा प्रतिकार 11 व्या मानांकित एल साल्वादोरच्या रॉबर्टो हर्नांडेझ व सोफिया पायझ यांच्याकडून मिळाला. ही लढत 155-155 (19-19) बरोबरीत राहिल्यानंतर शूटऑफमध्ये निर्णय घ्यावा लागला. शूटऑफमध्ये भारतीय जोडीने एकदा दहा गुण मिळविले, त्याचा त्यांना लाभ झाला.
आणखी एक भारतीय जोडी तरुणदीप राय व अंकिता भगत यांना मात्र पहिल्याच फेरीत बाहेर पडावे लागले. कझाकस्तानच्या जोडीकडून त्यांना शूटऑफमध्ये 4-5 (34-36, 37-33, 37-35, 35-36) (18-20) असा पराभव स्वीकारावा लागला. भारतीय जोडीने 4-2 अशी आघाडी घेतली होती, पण त्याचा त्यांना लाभ घेता आला नाही. कझाकी जोडीने नंतर मुसंडी मारत बरोबरी साधली आणि शूटऑफमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात आणले. शूटऑफमध्ये राय-अंकिता यांनी दोनदा 9 गुण घेतले तर कझाकी जोडीने दोनदा पूर्ण 10 गुण मिळविले. पात्रता फेरीत दीपिकाची घसरण झाल्याने अंकिताला रायसमवेत खेळण्याची संधी मिळाली होती.