ऑनलाईन टीम / अमरावती :
त्रिपुरातील अत्याचार आणि प्रार्थनास्थळांची नासधूस केल्याच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रातील अनेक शहरात उमटले. भाजपने शनिवारी अमरावती बंदची हाक दिली होती. मात्र, या बंदला हिंसक वळण मिळाले. आंदोलनकर्त्यांनी शहरातील दुकानांवर दगडफेक करत तोडफोड केली. या तोडफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमरावती पोलीस आयुक्तालयाकडून शहरात पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानंतर या हिंसाचाराला चिथावणी देणाऱया अफवा पसरवल्या जाऊ नयेत, यासाठी अमरावतीमधील इंटरनेट सेवा तीन दिवसांसाठी खंडित करण्यात आली आहे.
सध्या अमरावतीमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. शनिवारी जमावाकडून दुकानांवर दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर वैद्यकीय कारणाशिवाय कोणालाही घराबाहेर न पडण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत.