प्रेमसंबंधातून रचले गेले खूनाचे षडयंत्र, प्रेयसीच्या भावानेच दिली सुपारी
प्रतिनिधी /वास्को
वास्कोतील अमर नाईक खून प्रकरणातील प्रमुख सुत्रधाराचा छडा लावण्यास पोलिसांना यश आले आहे. हा प्रमुख सुत्रधार वास्कोतीलच राहणारा असून सध्या तो गोव्यापासून दूर असल्याने पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. मात्र, त्यालाही जेरबंद करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून जारी असून हे सुपारी प्रकरण प्रेम प्रकरणातून निर्माण झालेले असल्याचे उघडकीस आले आहे. पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी अमर नाईकच्या खूनासाठी त्याच्या प्रियसीच्या भावानेच सुपारी दिली होती असे स्पष्ट केले आहे.
अमर नाईकचा बोगमोळोतील रंघवी इस्टेटजवळ गुरूवारी संध्याकाळी दोघा भाडोत्री मारेकऱयांनी गोळय़ा झाडून खून केला होता. या घटनेने गोव्यात खळबळ उडाली होती. अमर नाईक हा खाण बंदीपूर्वी खाण उद्योगात होता. खाण बंदीनंतर तो मालमत्ता विक्री व्यवसायाकडे वळला होता. त्यामुळे पैशांच्या किंवा मालमत्ता देण्याघेण्याच्या विवादातून अमरचा खून झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. शिवाय अमरच्या एका प्रेमप्रकरणासंबंधीही हल्ली चर्चा वाढली होती. प्रेमप्रकरणही त्याच्या खूनाचे कारण असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. अमरचा खून हा सुपारी देऊनच करण्यात आल्याचे मारेकऱयांना अटक करण्यात आल्यानंतर स्पष्ट झाले होते. परंतु त्याचा सुपारी देऊन खून करण्यामागील उद्देशाबाबत अनेक तर्कविर्तक वर्तवण्यात येत होते. अखेर ही कोंडी फुटली आहे. हे खून प्रकरण प्रेमसंबंधातूनच घडल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस तपास आला आहे. त्यातूनच या सुपारी प्रकरणातील मुख्य सुत्रधाराचा छडा लावण्यास पोलिसांना यश आले आहे.
खून प्रकरणाच्या प्रमुख सुत्रधाराची ओळख पटली, अटकेसाठी प्रयत्न जारी
पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी सोमवारी रात्री या खून प्रकरणासंबंधी सविस्तर खुलासा करताना या प्रकरणातील प्रमुख सुत्रधाराची ओळख पटलेली असल्याचे स्पष्ट करून त्याचे नाव व पत्ता सांगण्याचे टाळले. अमर आणि खूनाचे षडयंत्र रचणारा एकमेकांना बऱयापैकी ओळखत होते. आतापर्यंत दोघा मारेकऱयांना आणि त्यांना या खूनासाठी गोव्यात आणलेल्या रवीशंकर यादव याच्यासह तिघांना या प्रकरणात अटक करण्यात आलेली असून प्रमुख सुत्रधार असलेल्या चौथ्या संशयीत आरोपीला जेरबंद करण्यासाठी पोलीस प्रयत्नरत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार मयत अमर नाईक याचे एका युवतीशी प्रेम संबंध होते. मात्र, त्यांचे हे प्रेमसंबंध त्या युवतीच्या भावाला मान्य नव्हते. त्यातूनच अमरप्रती त्या युवतीच्या भावाच्या मनात वैरभाव निर्माण झाला आणि त्याने अमरचा खून करण्याचे षडयंत्र रचले.
चार वर्षांपासूनचे प्रेमसंबंध मिटवायला पाच महिन्यांपूर्वी रचले होते षडयंत्र
अमर आणि त्या युवतीचे जवळपास चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आपल्या मुलीला अमरपासून दूर करण्याचे कुटुंबाचे प्रयत्न व्यर्थ ठरले होते. अमरही तीच्यापासून दूर झाला नव्हता. हे प्रेम प्रकरण विभिन्न धर्मातील असल्यानेच ही तेढ निर्माण झाली होती. हय़ा प्रेमाचा शेवट अखेर अमरच्या खूनात झाला. पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार अमरचा खून करण्याचे षंडयंत्र जवळपास सहा महिन्यापूवीं रचले होते. हे षडयंत्र गुरूवारी यशस्वी झाले. या प्रेम प्रकरणासंबंधी अमरचा खून झाल्यानंतर चर्चा वाढली होती. सदर युवती वास्कोतीलच असून तीचा भाऊ सध्या दुबईला नोकरी करीत असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी मात्र, त्या युवतीचा भाऊ असलेल्या प्रमुख सुत्रधाराची ओळख पटलेली असल्याचे सांगून त्याने या खूनाचे षडयंत्र का रचले यासंबंधी माहिती दिली. तो नक्की कुठे आहे याचा शोध पोलीस घेत असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
खूनासाठी संशयीत आरोपींपर्यंत पाच लाख रूपये पोहोचले होते
अमर नाईक याच्या खूनाचे षडयंत्र डोक्यात घोळू लागलेल्या त्या युवतीच्या भावाने या कामगीरीसाठी आपल्या पूर्वीच्या ओळखीच्या रवीशंकर यादव याच्याशी संपर्क केला होता. हा यादव पूर्वी वास्को नवेवाडेत राहात होता. व सध्या त्याचे वास्तव्य गोव्यातील हणजुण येथे होते. त्या दोघांमध्ये हे षडयंत्र मार्गी लावण्यासाठी प्राथमीक नियोजन झाले. या खूनासाठी त्या युवतीच्या भावाने आतापर्यंत रवीशंकर या संशयीत आरोपीपर्यंत पाच लाख रूपये पोहोचते केल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. त्यापैशांनीच त्याने पुढील नियोजन केले. रवीशंकर हा सध्या बेकार होता. त्यामुळे त्याने या षडयंत्रात लक्ष घातले. आपल्याच गावातील व ओळखीचे असलेल्या शैलेश गुप्ता व शुभम सिंग या दोघांना खूनाची कामगीरी पार पाडण्यासाठी त्याने गोव्यात आणले. उत्तर प्रदेश ते मुंबई व मुंबई ते गोवा असा प्रवास त्यांनी रेल्वेने केला. त्यानंतर त्यांचे वस्तव्य हणजुणे येथे होते. तेथूनच पूर्ण नियोजनाअंती ते अमरला गोळय़ा घालण्यासाठी वास्कोत आले. अमरची भेट घेण्यासाठी त्यांनी मालमत्ता विकत घ्यायची असल्याचा बहाणा केला होता. पहिल्या दोन भेटीत त्यांनी अंदाज घेतला व तीसऱया भेटीत त्यांनी अमरचा खून केला. मात्र, या घटनेप्रसंगी सोबत असलेला अमरचा मित्र, आणि त्या मारेकऱयांची अडकलेली स्विफ्ट कार या दोन गोष्टींमुळे या पूर्ण षडयंत्राचे बिंग फुटले.