सुरससुबोधा विश्वमनोज्ञा ललिता ह्रद्या रमणीया।
अमृतवाणी संस्कृतभाषा नैव क्लिष्टा न च कठिना।।
सुरस असलेली, सुबोध (समजण्यास सोपी), विश्वाला भुरळ पाडणारी, लालित्य असणारी, ह्रद्य, सुंदर अशी ही अमृतवाणी संस्कृत भाषा क्लिष्ट नाही आणि कठीणही नाही. आज ‘सुवचने’ सोडून मी एकदम संस्कृत भाषेबद्दल का लिहिले असा प्रश्न पडला असेल. पण त्याचे उत्तर मिळेलच! अनेक वाचकांना ‘अमृतवाणी’ सदर आवडते आहे. काहींनी संस्कृत शिकण्याची, संभाषण करण्याची इच्छा व्यक्त केली. म्हणजे हे सदर लिहिण्याचा हेतू काही प्रमाणात सफल होत असल्याचे पाहून आनंद वाटला. संस्कृत भाषेविषयी सर्वसामान्यांच्या मनात अनेक गैरसमज असतात. प्रामुख्याने संस्कृत भाषा खूप कठीण आहे, ती मृत भाषा आहे, ती विशिष्ट वर्गाचीच भाषा आहे वगैरे. पण तसे नाही.
ती जिवंत भाषा आहे. जीवित भाषा बनवण्यासाठी योग्य परिश्रम संस्कृत संभाषणासाठी घेतल्यास ती जनसामान्यांचीही भाषा होऊ शकते. जनमानसात बदल घडवू शकते. त्यासाठी संस्कृत बोलण्याची गरज आहे. ती विशिष्ट वर्गाची भाषा नाही. कारण वाल्मिकी भिल्ल होते, कालिदास मेंढपाळ होते, व्यासांचा जन्म मच्छीमार मुलीच्या पोटी झाला. श्रीहर्ष, राजा भोज हे क्षत्रिय होते. त्यांनी संस्कृतमध्ये ग्रंथरचना केली तर हजारो वर्षांपासून जगात प्राचीन आणि मार्गदर्शक असलेल्या संस्कृत भाषेला उर्जितावस्था प्राप्त करून देण्याची गरज आहे. त्यासाठी अनेक छोटय़ा-मोठय़ा संस्था आपापल्या परीने कार्य करीत होत्या. त्यांना एका छत्राखाली आणून संपूर्ण भारतात आणि भारताबाहेरही अनेक देशात तिचा व्यापकपणे प्रचार, प्रसार व्हावा म्हणून ‘संस्कृत भारती’ ह्या नोंदणीकृत अखिल भारतीय संस्थेची स्थापना करण्यात आली. तिचे केंद्रीय कार्यालय दिल्लीत आहे.
संस्कृत भारतीचे मुख्य उद्देश संस्कृत बोलणे, शिकवणे व संभाषणाच्या माध्यमातून संस्कृतचा प्रचार करणे आहे. ह्या भाषेच्या माध्यमातून जाती, पंथ, उच्च-नीच इ. भेद संपवणे आणि भारताचे सांस्कृतिक उत्थान करणे हे आहेत. त्यासाठी अनेक उपक्रम संस्कृत भारतीतर्फे राबवले जातात. उदा. संस्कृत संभाषण वर्ग, प्रशिक्षण वर्ग, कार्यकर्ते घडवणे, गीता शिक्षण केंद्र, पत्रद्वारा संस्कृत शिक्षण इत्यादी. ज्यांना संस्कृत शिकायची इच्छा आहे, त्याच्यासाठी घरबसल्या ‘पत्रद्वारा संस्कृत शिक्षण’ हा अतिशय उत्तम उपक्रम आहे. त्यादृष्टीने प्रथमच संस्कृत शिकणाऱयांसाठी अतिशय सोप्या भाषेत प्रवेश, परिचय, शिक्षा आणि कोविद या परीक्षांचे अभ्यासक्रम तयार केले आहेत. त्यांचा अभ्यास करून दोन वर्षात हे चारही अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. तेही घरी राहून. अत्यल्प शुल्कात पुस्तकासह परीक्षांच्या प्रश्नपत्रिकाही उपलब्ध होतात. घरी बसूनच प्रश्नपत्रिका सोडवून पोस्टाद्वारे पाठवायच्या असतात. त्यामुळे अगदी कमी खर्चात ह्या परीक्षा देता येतात. ‘प्रवेश’ परीक्षा देतेवेळीच आपला ‘व्यावहारिक’ संस्कृत म्हणजे सोप्या संस्कृतशी परिचय होतो. मराठीत अभ्यासक्रमाची मांडणी केल्यामुळे संस्कृतविषयीची भीती पळून जाते. ‘संस्कृतला संस्कृतीची वाहक’ का म्हणतात तेही लक्षात येते. संस्कारक्षम कथा, सुभाषिते आणि विज्ञान, गणित इ. विषयांची माहिती देणारे अनेक लेख यातून आपण समृद्ध होत जातो. अफाट माहिती देणारी ही परीक्षांची पुस्तके आहेत. कोणतेही ‘गाईड’ वापरण्याची त्यासाठी गरज नाही इतकी ती सुबोध आहेत.
दि. 31 जुलै ते 6 ऑगस्टपर्यंत संस्कृत भारतीचा हा भाषा महोत्सव कालावधी आहे. ह्याचा सोहळा 3 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 वा. ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, नागपूर’ यांचेद्वारे पार पडणार आहे.
तर अशा आपल्या प्राचीन संस्कृत भाषेला उर्जितावस्था आणण्यासाठी आपणा सर्वांचाही हातभार लागावा हीच इच्छा! त्यासाठी एकच ध्यास घ्यायचा आहे, ‘वदतु संस्कृतम् ।जयतु भारतम्।’ नमो नम:।