रब्बी ज्वारी, ऊस भुईसपाट; पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी
औंध / वार्ताहर :
औंध परिसरात झालेल्या धुव्वाधार अवकाळी पावसाने ऊस, रब्बी हंगामातील ज्वारीसह अन्य पिके भूईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने अशा पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
दोन दिवस आभाळ येत असले तरी काल सायंकाळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळीच्या धुव्वाधार पावसाने रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आणि ऊसाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऊसाला तुरे आले आहेत आणि उसतोड मिळत नसल्याने अगोदरच शेतकरी चिंतेत होता. त्यातच अवकाळीच्या दणक्यात ऊस पडल्याने उत्पन्नात घट होणार आहे. तसेच उंदीर, कोल्ह्याचा देखील प्रादुर्भाव वाढणार आहे.
रब्बी हंगामातील ज्वारी गहू हरभरा पिके देखील जोमात आहेत. सोसाट्याचा वारा आणि पाऊसामुळे हातातोंडाशी आलेले ज्वारीचे पिक जमिनीवर लोळले आहे. पिके भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळले आहे. औंधसह पुसेसावळी परीसरात नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शासनाने पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.