अध्याय सातवा
भगवंतांनी उद्धवाचा उद्धार व्हावा या दृष्टीने त्याला उपदेश करायला सुरुवात केली. त्यातून त्याला आत्मज्ञान व्हावे अशी त्यांची इच्छा होती. ब्राह्मणांची चेष्टा केली म्हणून यादवांना विनाशाचा शाप होता पण जर उद्धवाला आत्मज्ञान झाले तर त्याला तो शाप बाधणार नव्हता. हे लक्षात घेऊन भगवंतांनी उद्धवाला सांगितले की, कशाचाही मोह न बाळगता तू बद्रिकाश्रमात निघून जा. तेथे तू सुरक्षित राहशील पण त्यासाठी सर्वसंग परित्याग करून निर्मोही होणे आवश्यक होते. असा निर्मोही फक्त योगी म्हणजे कर्मयोगीच असू शकतो. त्याला कुणाकडूनही अगदी ईश्वराकडूनसुद्धा कसलीही अपेक्षा नसते. आत्मज्ञानी, तप करणारे आणि कर्मठ म्हणजे केलेल्या कर्माचा अभिमान बाळगणारे मोक्षाचे उद्दिष्ट मनात ठेवून प्रयत्न करत असतात. त्यांना देहबुद्धीची म्हणजे मी कर्ता आहे याची जाणीव असते पण कर्मयोगी निरपेक्षतेने कर्म करत असल्याने आपोआपच मृत्यूपूर्वी ईश्वराची अनुभूती घेऊन मोक्ष मिळवण्यास पात्र होतो. म्हणून तर भगवंतांनी अर्जुनाला तस्माद योगी भवार्जुन म्हणजे कर्मयोगी होण्याचा सल्ला गीतेच्या सहाव्या अध्यायात दिला आहे. योग म्हणजे आत्म्याचे परमात्म्याशी मिलन ही व्याख्या लक्षात घेतली तर हे मिलन होण्याच्या दृष्टीने कोणकोणते गुण अंगी असणे आवश्यक आहे हे उद्धवाच्या लक्षात यावे म्हणून भगवंतांनी त्याला यादवांचे पूर्वज यदू महाराज आणि अवधूत यांच्यातील संवाद समजाऊन सांगितला. अवधूत म्हणजे प्रत्यक्ष दत्तगुरु होते. अवधुतानी यदुमहाराजांना त्यांच्या चोवीस गुरुंची महिती सांगितली.
त्यापैकी पहिले आठ गुरु नाथमहाराजांनी सातव्या अध्यायात वर्णन करून सांगितले आहेत. अवधूत यदुला म्हणाले, राजा गुरुशिवाय कधी आत्मप्राप्ती होत नाही म्हणून ज्याचा जो गुण घेतला त्याला तर मी गुरु केलाच पण ज्याच्यात अवगुण होते ते माझ्यात येऊ नयेत म्हणून त्यालाही मी गुरु केला. म्हणून जगातले सर्वजण माझे गुरु झाले. त्यापैकी प्रमुख चोवीस गुरुंची माहिती तुला देतो. कुणाचेही गुण घ्यावेत आणि अवगुण त्यागावेत हा योगी होण्यासाठी पहिला धडा अवधुतानी घालून दिला. आपल्यासाठी तो खूप महत्त्वाचा असल्याने या अध्यायातील पहिल्या आठ गुरुंच्या गुणावगुणांचा अभ्यास आपण थोडक्मयात करू. परमार्थामध्ये शांती मुख्य आहे त्या शांतीकरता अवधुतानी पृथ्वीला गुरु केले. पृथ्वी ही तीन प्रकारे गुरु आहे. पर्वत, वृक्ष व भूमी या तिहीचे गुण अवधुतानी लक्षात घेतले व पृथ्वीला गुरु केले. अनेक प्राणी पृथ्वीला माता म्हणून झोंबत असतात आणि आपल्या मनाप्रमाणे तिचे तुकडे करत असतात. परंतु या सर्वांचे व्यवहार, व्यापार पृथ्वी चालवत असते आणि आपले एकात्मत्व न सोडता अखंड राहते. कर्मे जरी भिन्न भिन्न केली तरी मन सर्वदा एकरूप असावे. प्राण्याने पृथ्वीची पूजा केली किंवा घाण करून त्रास दिला, तरी त्याचा हर्ष विषाद न मानता ती आपली क्षमा म्हणजे परमशांती ढळू देत नाही. कारण ती सर्वत्र समभाव पहात असतात.
पृथ्वीकडून अवधूत अपकार करणाऱयांवर उपकार करणे शिकले. पृथ्वीला लोक अनेक प्रकारे त्रास देतात तिला जाळतात, नांगरतात, तिचे तुकडे करतात. तरी पृथ्वी सर्व सहन करून क्षमाशील वृत्तीने सर्वांना क्षमा करते आणि जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करते. तसेच पृथ्वीवरील पर्वत हेही रत्ने, हिरे लोकांना देत असतात. आपल्याकडील जास्तीत जास्त दुसऱयाला दिले की, तो जगदीश्वर देणाऱयाला सतत पुरवठा करत असतो हे अवधुतानी लक्षात घेतले. वृक्षाबद्दल बोलताना अवधूत म्हणाले, सर्वांगाने, सर्वतोपरी, सर्वकाळ आणि सर्वत्र पराधिनतेत असावे हेच मी वृक्षापासून शिकलो. तसेच वृक्षाने मला अतिथी पूजा शिकवली. वृक्ष कुणालाही नाही म्हणत नाहीत. ज्याला जे हवे त्याला ते देऊन टाकतात. त्याला जो लावतो त्याच्या तर तो आधीन असतोच पण त्याला तोडणाऱयाच्याही तो आधीन असतो. आपले दैनंदिन आयुष्य अनेक वस्तूवर, व्यक्तीवर अवलंबून असते ही लक्षात ठेवण्याची गोष्ट असून त्या सर्वांबद्दल आपल्या मनात सदैव कृतज्ञ भाव हवा हे वृक्ष आपल्याला शिकवतो.