पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती-आजार अंगावर न काढण्याचे तरुणांना आवाहन
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हय़ात लॉकडाऊन सुरु असताना देखील कोरोना बाधितांची संख्या वाढत आणखी बाधितांची संख्या वाढू नये यासाठी कडक लॉकडाऊन पुन्हा 5 दिवसांनी वाढवण्यात आला असून आता 15 एप्रिलपर्यंत जिल्हय़ात कडक लॉकडाऊन राहणार आहे. या काळात नागरिकांनी नियम पाळून प्रशासनास सहकार्य करावे. तसेच युवकांमध्ये बाधित होण्याचे प्रमाण वाढल्याचे समोर येत असून त्यांनी आजार अंगावर न काढता तात्काळ डॉक्टर्संना भेटून उपचार घ्यावेत, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
येथील शासकीय विश्रामगृहात जिह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा पालकमंत्री पाटील यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी परिस्थितीचा आढावा घेवून पालकमंत्री पाटील यांनी जिह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असून यामध्ये तरुणवर्ग जास्त बाधित होत आहेत. अशा बाधित रुग्णांनी आजार अंगावर न काढता तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधून औषधोपचार सुरु करावेत. तातडीने चाचणी व निदान झाल्यास कोरोना बरा होता. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जावू नये. नियम पाळल्यास संसर्ग कमी होण्यास मदत होईल.
ऑक्सिजन प्लँट सुरु करण्याच्या सूचना
जिह्यात ज्या ठिकाणी ऑक्सिजन प्लँट मंजूर केले आहेत तेथे तत्काळ प्लँट सुरु करण्याच्या कामास प्राधान्य द्यावे, अशा सूचना करुन पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, सहकारी साखर कारखान्यांनी ऑक्सिजन प्लँट सुरु करावेत, याबाबत साखर कारखान्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात यावे. शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी विविध रुग्णालयांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या कामाबरोबर कोरोनाबाबतची इतर कामे करीत आहेत. त्यांचा ताण कमी करण्यासाठी जिह्यातील खासगी डॉक्टरांनी सेवाभावी वृत्तीने लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी या बैठकीत केले.
15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला
लॉकडाऊन असून देखील जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने 15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवत असल्याचा आदेश प्रभारी जिल्हादंडाधिकारी रामचंद्र शिंदे रविवारी जाहीर केला. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने, कृषी, हॉटेल, रेस्टारंट व मद्यविक्री सकाळी 7 ते 11 या वेळेत घरपोच देण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, दुकाने बंदच राहतील असे आदेश म्हटले आहे. तर नागरिकांनी आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घरी राहूनच उर्वरित काळात कोरोनापासून दूर राहून संसर्ग साखळया तोडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले आहे.