वार्ताहर/ राजापूर
कोरोनाच्या साथीत कोकणी माणसाला दिलासा देण्याचे काम नवी मुंबईचे माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक अविनाश लाड यांनी सुरूच ठेवले आहे. सुरूवातीला लांजा व राजापूर तालुक्यातील प्रत्येक घर निर्जंतुकीकरण करण्यासाठी शेकडो टन जंतूनाशक पाठवून देऊन त्याची फवारणी करण्याची व्यवस्था केल्यानंतर आता श्री.लाड यांनी दहा टन धान्य पाठवून लांजा-राजापुरातील गरजू आणि निराधारांची लॉकडाऊनच्या कालावधीत भूक भागविण्याचा प्रयत्न केला आहे
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ग्रामीण भागात ग्रामस्थांना अनेक समस्या जाणवत आहे. याची दखल घेत नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड यांनी विशेष खबरदारी घेत लांजा-राजापुरातील संपूर्ण गावे निर्जंतुकीकरणासाठी त्यांनी चार टन सोडियम हायप्लोक्लोराईडचा पुरवठा केला होता. त्यांतून गावोगावी फवारणी करण्यात आली. राजापूर नगर परिषदेला देखील दोनशे लिटर्स सोडियम हायप्लोक्लोराईडचा पुरवठा करण्यात आला होता तर लांजा-राजापूर मतदारसंघातील प्रत्येक गावाला पंधरा लिटर सोडियम हायप्लोक्लोराईड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिले गेले होते.
दरम्यान श्री.लाड यांनी आता या दोन्ही तालुक्यांतील गरजू आणि निराधारांसाठी तब्बल दहा टन धान्याचा पुरवठा केला आहे. लाड यांच्या या सेवाभावनेचे कौतुक करीत लांजा-राजापूर नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी धन्यवाद दिले आहेत.