अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांची अधिकाऱयांना सक्त ताकीद
प्रतिनिधी / बेळगाव
खोटी माहिती देवून बोगस बिपीएल कार्डे अनेकांनी घेतली आहेत. त्या कार्डांच्या कुटुंबियांची संपूर्ण माहिती घेवून ती कार्डे रद्द करावीत. त्यासाठी विशेष मोहीम राबवा, अशी सूचना अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्री उमेश कत्ती यांनी अधिकाऱयांना केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेवून त्यांनी प्रगती आढावा घेतला. यावेळी सरकारच्या मार्गसुचीनुसार जी बीपीएल कार्डे आहेत त्या कार्डांनाच मान्यता द्या. मात्र इतर कार्ड आहेत ती तातडीने रद्द करा, अशी सक्त ताकीद त्यांनी केली. लोकसंख्येपेक्षा जास्तकार्ड वितरीत करण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. आरोग्य संदर्भातील योजनांचा लाभ घेण्यासाठी बीपीएल कार्ड घेण्यासाठी चढाओढ सुरू आहे. मात्र जर त्यासाठी ते कुटुंब योग्य नसेल तर त्यांना कार्ड देवू नका, असे त्यांनी यावेळी सांगितले.
रॉकेल वितरणामध्ये सावळा गोंधळ सुरू आहे. त्याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. तेंव्हा सिलिंडर असलेल्या व्यक्तींना रॉकेल दिले जात नाही. असे असताना खोटी माहिती देवुन रॉकेलही घेतले जात आहे. तेंव्हा याबाबत लवकरच एक बैठक घेवून निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. रेशन कार्डवर धान्य वितरीत करण्यासाठी स्थानिक पातळीवरील गहू, तांदूळ खरेदी करण्यावरही लक्ष देणे गरजेच आहे. यासाठी कृषी अधिकाऱयांनी पाऊल उचलावेत, असे त्यांनी सांगितले आहे.
यावेळी खासदार इराण्णा कडाडी म्हणाले, सरकारला खोटी माहिती देवून अनेक जणांनी रेशनकार्ड घेतले आहे. त्या कार्डाचा तपास होणे गरजेचे आहे. जे नियम आणि अटी आहेत त्यानुसार त्याचा तपास करावा. योग्य व्यक्तीला चांगल्या प्रकारचे धान्य वाटप करावेत, असे त्यांनी सांगितले. या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ रेशनकार्ड संदर्भातील माहिती दिली. एकूण 14 लाख 40 हजार बीपीएल रेशनकार्ड आहेत. त्याचबरोबर 34 लाख व्यक्ती त्याचा लाभ घेत आहेत, अशी माहिती देण्यात आली. यावेळी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे सहसंचालक सी. बी. कोडली यांनी कार्ड आणि रेशन वितरणाची माहिती दिली आहे.
डिसेंबर महिन्यामध्ये 738 कार्ड बेकायदेशीर होते. त्याची माहिती घेवून ती रद्द करण्यात आली आहेत, असे कोडली यांनी सांगितले. या बैठकीला आमदार अनिल बेनके, प्रांताधिकारी अशोक तेली, कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगौडा पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.