महाराष्ट्र लोक सेवा आयोगाकडे राज्यकर्त्यांनी केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि दफ्तर दिरंगाईमुळे केवळ एखाद-दुसरा ‘स्वप्नील’ मावळत नसून, असंख्य तरुणाईची स्वप्ने धुळीस मिळत असतात. वारंवार पुढे ढकलल्या गेलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर तरुणाईच्या आकाक्षांना ‘वाचा’ देण्याचा प्रयत्न या स्तंभाद्वारे आधीही झालेला आहे. (रुततात काटे इथे; आक्रंदात युवा, 16 मार्च 2021) खासगी क्षेत्राचा, सेवा क्षेत्राचा विस्तार नसलेल्या अप्रगत राज्यात लोक सेवा आयोग खेडोपाडय़ातील शेती, मजुरी करून अर्थार्जन करणाऱया सर्वसामान्य बहुजन समाजातील पदवीधारकांसाठी आशेचा ‘दीप’ असतो. ‘ऍस्पिरंट’ या बहुचर्चित वेबमालिकेतील अनेक ‘संदीप’ आपल्याही अवती-भवती असतात. राजस्थान लोक सेवा आयोगाद्वारे ऑगस्ट 2018 मध्ये वर्ग-एक, वर्ग-दोन, आधिनस्थ पदांसाठी पूर्वपरीक्षा झाली होती. मुख्य परीक्षा 25 जून 2019 रोजी झाली. पुढील कोरोना काळात जवळ जवळ एका वर्षापेक्षा जास्त कालावधी आयोगाला काम करता आले नव्हते. जेव्हा जेव्हा कोरोनाने उसंत दिली तेव्हा तेव्हा आयोगाने जोरकसपणे मुलाखतींचा टप्पा पार पाडून मागील मंगळवारी 2018 च्या परीक्षांचा निकाल जाहीर केला. चाळणी परीक्षेपासून अंतिम निकालापर्यंत लागलेला तीन वर्षांचा टप्पा हा निश्चितच मोठा आहे. तरीही या निकालाने राजस्थानमधल्या तरुणाईला भावनिक दिलासा मिळाला आहे. राजस्थानसारख्या अनेक राज्यांमध्ये आयोगाचे निकाल हे न्यायालयीन याचिकांमुळे अनेक वर्षे लांबणीवर पडल्याचा सार्वत्रिक अनुभव आहे. अनेकदा भ्रष्ट्राचाराची, घोटाळय़ांची प्रकरणे उघडकीस आल्यामुळे आयोगाच्या विश्वासार्हतेलाही गालबोट लागत असते. राज्याचे पोलिस प्रमुखपद भूषवलेले डॉ. भूपेंद्र यादव निःस्पृहतेसाठी ओळखले जातात. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कालखंडात आयोगाचा कारभार बऱयापैकी नियमित झालेला आहे.
आयोगाच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी रात्री लागल्यानंतर गुरुवारी दुपारी जोधपूर महानगरपालिकेत आजी-माजी महापौरांच्या हस्ते आणि अनेक शासकीय अधिकाऱयांच्या उपस्थितीत ‘आशा कंडारा’ या महिलेचा भव्य सत्कार झाला. अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये जन्मलेल्या आशाताईंना बुधवारपर्यंत कोणी ओळखत नव्हते. दोन मुलांच्या आईला ‘नवऱयाने टाकून दिलेली बाई’ म्हणून समाजाच्या तिरस्कृत आणि हीन नजरांचा सामना करून, आशा आई-वडिलांच्या आश्रयाने माहेरी राहत होती. 1997 मध्ये झालेले तिचे लग्न, पदरच्या दोन मुलांच्या जबाबदारीसह 2002 मध्ये मोडले होते. अनेक अपमान गिळून आशा अनेक वर्षांनंतर दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली. पाठोपाठ बारावीही केली. जोधपूर महानगरपालिकेत सफाई कर्मचारीपदाची परीक्षा पास होऊन आशा शहर झाडण्याच्या कामाला लागली. विषारी नजरांमुळे विद्ध वा घायाळ न होता, याच समाजाला काही करून दाखवू या जिद्दीने आशा पुन्हा शिक्षणाला भिडली. 2016 मध्ये पदवीधर झाली. प्रत्येक अभावामध्ये संधी शोधली. मुलांसोबत अभ्यास करताना, अक्षरशः रात्रीचा दिवस केला. 2018 मध्ये झालेली चाळणी परीक्षा, तदनंतरची मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचा टप्पा आटोपून आशा कंडारा आज अधिकारीपदाच्या वाटेवर आहे. जिद्द, स्वप्न, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम या चारच गोष्टी त्यांच्या बाजूने होत्या. कोणताही क्लास वा विशेष शिकवणी वर्ग न घेता अधिकारी होऊ पाहिलेल्या आशा कंडारा या सर्वहारा समाजासाठी जीवन परीक्षांचा सामना करण्यासाठीही मोठय़ा ‘प्रेरणा’ ठरल्या आहेत. दोन महापौरांच्या आणि अधिकाऱयांच्या उपस्थितीत थरथरत्या अंगाने, कंपित आवाजाने, वारंवार डोळे भरून येणाऱया आशाताईंचे भाषण परिघावरच्या माणसांसाठी वेदनेचा ‘वेद’ झालेले होते. कल्याणकारी राज्यात डॉ. बाबासाहेबांचे संविधान आणि याच संविधानाद्वारे निर्माण झालेल्या संस्था जर सक्षमपणे कार्यरत राहिल्या तर भारतीय लोकशाहीत काय चमत्कार होतात याचे उदाहरण राजस्थान लोकसेवा आयोगामुळे जोधपूरकरांसह राजस्थानात पुनःप्रक्षेपित झाले.
अशीच एक प्रेरणादायी गोष्ट लगतच्या बाडमेर जिल्हय़ातल्या बायतू भागातील. कानोड गावातील देराजराम डुबेर हा अल्प भूधारक शेतकऱयाचा मुलगा. ज्याने जाणत्या वयात शेळय़ा राखल्या. वडिलांना शेतीमध्ये मदत केली. चक्क हमालीदेखील केली. 2011 मध्ये देराजराम ‘तलाठी’ परीक्षा उत्तीर्ण झाले. 2012 मध्ये शिक्षकाची परीक्षा उत्तीर्ण झाले. अधिकारी बनण्याचे स्वप्न त्यांच्या उराशी घट्ट होते. 2013 आणि 2016 मध्ये देराजराम मुलाखतींच्या टप्प्यापर्यंत पोहोचले होते. 2018 च्या परीक्षेत स्वप्नांची पूर्तता झाली. देराजराम आज ग्रामीण युवकांना दीपस्तंभासारखे दिसायला लागले आहेत. हनुमानगढ जिल्हय़ातील रावतसर तालुक्मयातील भैरुसरी गाव हे तर ‘बेटी बचाव बेटी पढाव’ अभियानाचे केंद्र व्हावे, इतके प्रसिद्धीस आले आहे. या गावातील सहदेव सहारन या आठवी पास शेतकरी बाबांना पाच मुली आहेत. रोमा आणि मंजू या दोन विवाहित मुली याआधीच स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी पदावर कार्यरत आहेत. 2018 च्या या परीक्षेत अंशु, सुमन आणि ऋतु या तीनही बहिणींची निवड झाली आहे. पंचकन्यांच्या निरक्षर आईचा आणि अल्पशिक्षित बाबांचा साऱया गावाने मिळून सत्कार केला. एरवी महिलांना सार्वत्रिकरित्या कःपदार्थ अथवा निम्न समजल्या जाणाऱया समाजासाठी सहारन भगिनी आदर्शवत ठरलेल्या आहेत. याही तीन भगिनींनी ‘स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी क्लासेसची मुळीच गरज नसते’ असे सांगून मेहनत, लगन आणि इमानदारी या त्रिसूत्रीचा
पुनरुच्चार केलेला आहे.
आता महिलांच्याच यशोगाथेचे वर्णन चालले असल्यामुळे वाचकांना हेही सांगायला हवे की आता निकाल लागलेल्या 2018 च्या गुणवत्ता यादीत प्रथमस्थानी ‘मुक्ता राव’ ही महिलाच झळकली आहे. लग्नानंतर तब्बल चौदा वर्षांनी त्यांनी दुसऱया प्रयत्नात हे राज्य लोकसेवा आयोगाचे ‘लक्ष्य’ संपादन केलेले आहे. वडिल, सासरे आणि मणिपाल विद्यापीठात संगणक विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. विजय पालसिंग ढाका या तीन प्रौढ पुरुषांना आणि छोटय़ा मुलाच्या पाठिंब्याला-प्रोत्साहनाला मुक्ता राव आपल्या यशाचे श्रेय देतात. महिलांच्या स्वप्नांना पुरुषांचे पाठबळ मिळावे, किमानपक्षी पुरुष सत्ताकतेची वृत्ती बाधा न ठरल्यास महिलांचे प्रवास सुगम होतील. या गुणवत्ता यादीत झळकलेल्या पहिल्या दहांमध्ये 4 महिला तर पहिल्या 20 जणांमध्ये 9 महिला हे महिलांच्या लढावू वृत्तीचे द्योतक आहे. 2016 च्या परीक्षांमध्ये 28… महिलांनी यश संपादन केले होते. तर 2018 च्या परीक्षेत महिलांच्या यशाची टक्केवारी ही 40… इतकी स्तिमित करणारी आहे. गुणवत्ता यादीतील प्रत्येकी चौथा उमेदवार हा पूर्वाश्रमीच्या सरकारी नोकरीमधील वा खासगी क्षेत्रातील आहे. त्यामुळे पुढील काही काळात राजस्थानसाठी वेगवेगळय़ा क्षेत्रात नोकऱयांच्या संधी निर्माण होणारच आहेत. राजस्थानाकडून घेण्यासारखे देशाला आणि विशेषतः महाराष्ट्राला अनेक धडे आहेत. लोकसेवा आयोगाचा नेटका कारभार हे त्यातील एक उदाहरण होय.
डॉ. जगदीश जाधव