केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचा आरोप : कायदे हिताचेच असल्याचे प्रतिपादन, आंदोलन मागे घेण्याचे आवाहन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या सीमेवर गेल्या पंधरा दिवसांपासून चाललेल्या शेतकरी आंदोलनाचा ताबा आता देश तोडू पाहणाऱया ‘टुकडे टुकडे गँग’ने घेतला आहे, अशी प्रखर टीका केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. शेतकऱयांच्या निरागसतेचा लाभ उठवून देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. ते शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलत होते.
देशाच्या विकासाला बाधा आणण्यासाठी शेतकरी आंदोलनाचा आसरा घेतला जात आहे. याच देशविघातक शक्तींमुळे सरकारशी नव्या कृषी कायद्यांसंबंधी झालेली चर्चा निष्फळ झाली असावी, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. शेतकऱयांनी स्वतःला अशा दुष्ट शक्तींच्या हातात जाण्यापासून सावरावे, असे कळकळीचे आवाहनही रविशंकर प्रसाद यांनी येथे
केले.
चर्चेची तयारी
सरकारकडून शेतकऱयांच्या सर्व अडचणी ऐकण्याची आणि त्यावर त्यांच्या शंकांचे निराकरण करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, शेतकरी ते मानत नाहीत. वास्तविक सरकारचे नवे कृषी कायदे चांगले असून शेतकऱयांचा त्यांपासून लाभ होणार आहे. मात्र, या कायद्यांचा विचार न करताच त्यांना विरोध केला जात आहे. विरोधी पक्षही केवळ राजकीय गैरफायदा उठविण्याच्या प्रयत्नांमध्ये आहेत, असे अनेक आरोप या संदर्भात रविशंकर प्रसाद यांनी केले.
भाजपची देशव्यापी संपर्क मोहीम
नव्या कायद्यांच्या लाभासंबंधी शेतकऱयांचे प्रबोधन करणे आणि जनजागृती करणे यासाठी भाजपने देशव्यापी मोहीम आखली आहे. या मोहीमेअंतर्गत देशात 700 पत्रकार परिषदा घेण्यात येणार आहेत. या परिषदांमध्ये या कायद्यांचे महत्व, त्यांची आवश्यकता, घटनात्मकता आणि लाभ स्पष्ट करण्यात येतील. त्याचप्रमाणे शंकांना उत्तरेही देण्यात येतील, अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.
त्याचप्रमाणे देशभरात 100 स्थानी शेतकऱयांशी संवाद साधला जाईल. त्यांनाही या कायद्याचे महत्व पटवून देण्यात येईल. या कामासाठी पक्षकार्यकर्ते व स्वयंसेवक यांचे साहाय्य घेण्यात येईल. विरोधी पक्ष या कायद्यांचा बागुलबुवा उभा करून शेतकऱयांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना रोखण्याचा व त्यांच्या कुटील नीतीसंबंधी शेतकऱयांना सावध करण्याची मोहीम या कार्यकमांतर्गत भाजपकडून हाती घेण्यात आली आहे.
पत्रकेही वितरीत करणार
या कायद्यांचे लाभ दर्शविणारी पत्रके वितरीत केली जाणार आहेत. अनेक मान्यवरांचे साहाय्य ही पत्रके तयार कण्रयासाठी कृषी तज्ञ व कायदेतज्ञांचे साहाय्य घेतले जाणार आहे. शेतकऱयांसमवेतच सर्वसामान्य जनतेलाही या कायद्यांची माहिती आणि बारकावे भारतीय जनता पक्षाकडून समजावून सांगितले जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.