‘कोविड’च्या साथीच्या दुष्परिणामांची यादी केली तर खूप मोठी होईल. या साथीमुळे लाखो माणसे प्राणास मुकली. लाखो बेकार झाली. अगणित रकमेची औद्योगिक, व्यावसायिक नि व्यापारी हानी झाली. याशिवाय दीर्घकालीन ’लॉकडाउन’सारख्या परिस्थितीमुळे केवळ आर्थिकच नव्हे तर एकूणच मानवी जीवनात कमालीचा विस्कळीतपणा आला. या विचित्र रोगाच्या साथीने एकेका क्षेत्राचे कंबरडे मोडले. जसे, पर्यटन, मोटार उत्पादन, शिक्षण इत्यादी. हा फटका इतका जोरदार होता की पुन्हा कधी घडी बसेल हे सांगणे कठीण होऊन बसले.
या रोगाच्या साथीच्या ‘लाटा’ येत राहिल्या आणि त्यांनी लागोपाठ दोन वेळा ‘लॉकडाउन’ची परिस्थिती निर्माण केली. या रोगाने बळी पडणाऱया माणसांमध्ये प्रौढ वयातील स्त्रीपुरुष अधिक होते. त्यामानाने लहान मुलांना कमी झळ पोहोचली असे आढळले. मात्र प्रत्यक्ष रोगाची लागण झाल्याने मुलांची जीवितहानी कमी झाली असली तरी रोगाने निर्माण केलेल्या परिस्थितीचे फटके ज्यांना सर्वाधिक बसले त्यात बालकवर्ग पुढे आहे. बालमजुरी जगभर मोठय़ा प्रमाणावर अस्तित्वात आहे, तरीही बालके म्हणजे कामगार अगर नोकरदार वर्ग नव्हे असे गृहीत धरले तर बालकांना बसलेला ‘कोविड’चा फटका आणखी गंभीर वाटू लागतो. गेल्या पाऊणशे वर्षांत दारिद्र्य़, अनारोग्य आणि शिक्षणापासून वंचित राहणे या तीन गोष्टी बालकांबाबत गेल्या वर्षभरात यावेळेइतक्मया वाईट कधीच नव्हत्या. ‘युनिसेफ’च्या एका अहवालातून नुकतेच हे दिसून आले आहे.
‘युनिसेफ’च्या कार्यकारी संचालक श्रीमती हेन्रीएट्टा फोअर यांनी एका वार्तालाप कार्यक्रमामध्ये केलेल्या विधानावरून हे स्पष्ट झाले आहे. मुलांच्या शिक्षणासाठी निधी उपलब्ध करणाऱया या संस्थेची स्थापना पाऊणशे वर्षांपूर्वी झाली. तेव्हापासून झालेल्या कार्याला ‘कोविड’ने खीळ तर बसलीच, पण परिस्थिती आणखी गंभीर झाली. वाढते दारिद्र्य़, विषमतेची रुंदावणारी दरी आणि बालकांच्या मानवी अधिकारांवर होणारे वाढते आक्रमण हे या क्षणाचे भेडसावणारे प्रश्न आहेत, असे या अहवालात नमूद केले आहे. बालकांचे शिक्षण आणि पोषक आहाराच्या क्षेत्रात केलेल्या प्रगतीची जणू दिशाच बदलली. ही बदललेली दिशा पुन्हा जाग्यावर आणणे गरजेचे आहे आणि बालकांसाठी करावयाच्या खर्चासाठी असलेल्या तरतुदींमध्ये कपात न करता त्यासाठी आणखी गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले पाहिजे.
दारिद्र्य़ाने गांजलेल्या, उपासमारीने पछाडलेल्या, अत्याचाराने हैराण झालेल्या, लसीकरणापासून वंचित आणि सक्तीने लहानपणी लग्ने होणाऱया मुलांच्या संख्येत वाढ झाली आहे. आरोग्याच्या आणि अन्य सुविधा तसेच पुरेसे अन्न मिळणाऱया मुलांची संख्या घटली आहे. सहा कोटीपेक्षा जास्त मुले आर्थिकदृष्टय़ा दुर्बल, सव्वा दोन कोटीपेक्षा जास्त मुले लसीकरणापासून दूर आणि सोळा कोटी मुले शाळेच्या बाहेर आहेत.
ही परिस्थिती विशेषतः आफ्रिकेतील देशांत जास्त आहे. या मुलांपर्यंत या सर्व सुविधा पोहोचविण्यास विशेष प्रयत्न करण्यावर भर दिला पाहिजे. समाजाच्या वेगवेगळय़ा स्तरांवर, निरनिराळय़ा घटकांमध्ये संघर्ष चालू आहेत, ते वाढलेले आहेत. याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होत आहे. हवामान बदलाचा प्रचंड परिणाम निसर्गाच्या चक्रावर झाला आहे आणि अपरिहार्यपणे त्याचा वाईट प्रभाव मुलांच्या वर्तमानावर आणि भवितव्यावर होत आहे. त्यांना दर्जेदार शिक्षण देणे, सुरक्षा पुरविणे आणि पोषक आहार पुरविणे या प्राधान्याने करावयाच्या गोष्टी आहेत.
आपण एका विचित्र वळणावर आहोत असे फोअर बाईंनी सांगितले. गेल्या वषी बालकांच्याबाबत हिंसाचाराचे चोवीस हजार गुन्हे घडले. दररोज सुमारे बहात्तर गुन्हे घडतात. यांना आळा घालण्यासाठी ‘युनिसेफ’ने 94 कोटी डॉलर निधी उभारण्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे. जगभरातील सरकारे, बडे देणगीदार आणि जगदव्यापी संघटना यांनी पुरविलेल्या रकमांमधून या आंतरराष्ट्रीय संस्थेचा निधी उभा राहतो. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ यांसारख्या कारणांमुळे लहान मुलांची जी परवड होते, ती रोखण्यासाठी नवीन उपाययोजना करण्यात आल्या पाहिजेत अशी या संस्थेची कल्पना आहे.
बालकांचे लसीकरण पूर्ण व्हावे आणि त्यांना पोषक आहाराची प्राप्ती व्हावी यासाठी खात्रीपूर्वक अंमलबजावणी करणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. परिस्थिती अशी आहे की अशा संकटात सापडलेल्या बालकांचे सर्वाधिक प्रमाण आफ्रिकेतील देशांमध्ये आहे आणि त्यांपैकी पुष्कळसे अंतर्गत यादवी, धार्मिक दहशतवाद, दारिद्र्य़, बेरोजगारी आणि अत्यंत अस्थिर राजकीय परिस्थिती या कारणांनी घेरलेले आहेत. अशा देशांना बालकांच्या समस्या हाताळण्यासाठी स्वतःचा निधी उभा करणे कठीण आहे आणि त्यांच्याकडे त्यासाठी आवश्यक संरचनेचीही कमतरता आहे.
त्रास सोसणाऱयांची आकडेवारी मोठी आहे, बालविवाह होणाऱयांची संख्या एक कोटीच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. एका वर्षात बालमजुरांच्या संख्येत पंचाऐशी लाखांची भर पडून ती एक कोटी साठ लाखावर पोहोचली. दहा ते एकोणीस वयोगटातील मुले रोजगाराच्या दावणीला बांधली गेली. वाढत्या दारिद्र्य़ामुळे आणखी नव्वद लाख मुले मुली शालेय शिक्षणापासून बाहेर फेकली जाण्याची भीती आहे. जगात एकूण चार कोटी सव्वीस लाख मुले वेगवेगळय़ा प्रकारच्या संघर्षमय परिस्थितीशी झगडत आहेत. दुसऱया शब्दांत, जगातील प्रत्येक पांच मुलांमागे एक असे हे प्रमाण आहे. यामध्ये मुलींचे प्रमाण लक्षणीय आहे. स्त्रिया आणि मुलींना लैंगिक शोषणाला तोंड द्यावे लागत आहे. आकाश फाटले आहे, कुठे कुठे ठिगळे लावणार हा प्रश्न पडण्यासारखी स्थिती आहे.
राजेंद्रप्रसाद स. मसुरकर