प्रतिनिधी/ रत्नागिरी
लॉकडाऊन आणि अन्य निर्बंधांमुळे सुमारे दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेल्या राज्यभरातील शाळा सुरू होऊन 24 दिवस उलटले असतानाच दिवाळीसाठी 1 ते 15 नोव्हेंबरपर्यंत यापूर्वी जाहीर केलेल्या सुट्टीच्या तारखेत अचानक बदल करण्यात आला आहे. ही सुट्टी आज 28 ऑक्टोबरपासून 10 नोव्हेंबरपर्यंत लागू करण्यात आल्याने जिल्ह्य़ातील शाळांच्या शैक्षणिक नियोजनात गोंधळ निर्माण झाला आहे.
राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय परिसर 4 ऑक्टोबरपासून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजून गेले होते. रत्नागिरी जिह्यात 1 ते 15 नोव्हेंबर अशी दिवाळीची सुटी वार्षिक नियोजनानुसार निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार शाळांनी आपले अभ्यासक्रम, परीक्षा, उपक्रमांचे नियेजन केले होते. या नियोजनाची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात असताना बुधवारी दुपारी शासनाने परिपत्रक जारी करून चक्क गुरुवार पासूनच तातडीने सुटी सुरु करण्याचे आदेश जारी केले. यामुळे नियोजनाचा गोंधळ उडाल्याने शैक्षणिक संस्थांकडून तीव्र नाराजी वक्त करण्यात येत आह.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2021 दरम्यान दिवाळी सणाची सुट्टी राहणार आहे. राज्य शासनाने नव्याने काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे जिल्हा परिषदेनेही त्याची अंमलबजावणी म्हणून 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत शाळांना दिवाळी सुट्टी घोषित केली आहे. त्यामुळे सुरु झालेले वर्ग नियोजनाआधीच 3-4 दिवस आधी अचानकपर्णे पुन्हा बंद झाले आहेत. या कालावधीत शाळांकडून सुरू असलेले ऑनलाईन अध्यापनही बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले.
दिवाळी सुट्टीचा कालावधी अचानक मागे घेण्यात आल्याने शाळा व्यवस्थापनाचा गोंधळ उडाला. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सत्रांत परीक्षा सुरु होत्या. त्यातील काही विषयांच्या परीक्षा अपूर्ण राहणार आहेत व त्यांचे पुन्हा नियोजन करावे लागणार आहे. याबरोबरच सुटीचा अभ्यास व अन्य नियोजनाचाही फज्जा उडाला आहे. अचानक व तातडीने आजपासून सुट्टी जाहीर झाल्याने विद्यार्थी, शिक्षक व शाळा व्यवस्थापन सारेच बुचकळय़ात पडले आहेत.
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी शाळा वेठीस?
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी शाळांच्या दिवाळी सुट्टीत अचानक बदल केल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा बदल अचानक केल्याने संताप व्यक्त होत आहे. हजारो शाळा आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळ करण्याची शिक्षण विभागाची कार्यपध्दती पुन्हा एकदा टीकेचे लक्ष बनली आहे. 10 वी 12 वीचे मूल्यमापन नेमके कसे होणार, हे अर्धे वर्ष सरले तरी अधिकृतपणे जाहीर करण्याचे सौजन्य न दाखविणारा शिक्षण विभाग नेमके काय करत आहे, असा प्रश्न शिक्षकांकडून विचारला जात आहे.