एमएसएमई मंत्रालयाचा नवा पुढाकार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशभरात लघूउद्योगाला चालना देणे आणि स्टार्टअपच्या गजरेच्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारने ‘संभव’ नावाने नवी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेची सुरुवात एमएसएमई मंत्रालयाकडून करण्यात आली आहे.
देशातील तरुणाईच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी ही ‘संभव’ मोहीम राबविली जाणार आहे. याच्या अंतर्गत एमएसएमई योजनांचे लाभ पोहोचविले जातील. सध्या या जागरुकता मोहिमेशी देशभरातील सुमारे 14 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना जोडण्यात आले आहे. याचबरोबर 7 हून अधिक विद्यापीठे देखील या मोहिमेचा हिस्सा ठरणर आहेत.
स्टार्टअप सुरू करू पाहणाऱया लोकांसाठी ही योजना अत्यंत लाभदायक ठरणार आहे. ग्रामीण भागातील लोक सरकारी मदतीने स्वतःच्या उद्योगांचा विस्तार करण्यास यशस्वी व्हावेत असा आमचा प्रयत्न असल्याचे उद्गार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काढले आहेत. हा कार्यक्रम एक महिन्यापर्यंत चालणार आहे. यात प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेण्याची संधी देशभरातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. एखादा तरुण किंवा तरुणी विशेष कल्पनेवर काम करू इच्छित असल्यास तिला विशेष संधी मिळणार आहे.
पुढील काही वर्षांमध्ये 15 कोटींहून अधिक एमएसएमई स्टार्टअप सुरू करण्याच्या प्रयत्नात सर्वसामान्य लोकांना सहाय्य करण्याची सरकारची योजना आहे. याकरता विद्यार्थ्यांना ‘संभव’ योजनेच्या अंतर्गत स्टार्टअप सुरू करणे आणि शासकीय निविदा प्रक्रियेत कशाप्रकारे भाग घेतला जावा याची पूर्ण माहिती देण्यात येईल.