ज्वलंत विषयांवरुन गदारोळाची शक्यता
प्रतिनिधी / पणजी
राज्य विधानसभेचे 2021 या नवीन सालातील पहिले हिवाळी अधिवेशन आज सोमवार दि. 25 जानेवारीपासून सुरु होत असून त्यात विविध महत्त्वाचे ज्वलंत विषय चर्चेला येण्याबरोबरच विरोधी पक्ष काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, मगोप यांची कसोटी लागणार आहे. हे अधिवेशन शुक्रवार दि. 29 जानेवारीपर्यंतच चालणार असून मंगळवारी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने एकूण चारच दिवस कामकाज होणार आहे.
विरोधक सरकारला घेरणार
विरोधी काँग्रेस पक्ष विविध प्रश्न, समस्या मांडून सरकारला घेरणार असून जाब विचारणार असल्याने विधानसभेत गोंधळ माजण्याची शक्यता आहे. सोमवारी प्रथम दिवशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे सकाळच्या सत्रात अभिभाषण होणार असून त्यानंतर फारसे काही कामकाज नाही. बुधवार ते शुक्रवार असे तीन दिवस सकाळच्या सत्रात प्रश्नोत्तर तास, शून्य तास, लक्षवेधी सूचना असे कामकाज निश्चित करण्यात आले आहे. दुपारनंतरच्या सत्रात पुरवणी मागण्यांवर चर्चा तसेच राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा, विधेयके असे कामकाज होईल. शुक्रवारी खासगी कामकाजाचा दिवस आहे.
सत्ताधारी-विरोधी आमदारांचे 751 प्रश्न
सत्ताधारी – विरोधी आमदारांचे मिळून एकूण 751 प्रश्न विधानसभा अधिवेशनासाठी आले आहेत. त्यातील 195 प्रश्न तारांकीत तर 556 प्रश्न हे अतारांकीत आहेत. त्याशिवाय सरकारी – खासगी विधेयके देखील सादर करण्यात येतील. आमदारांकडून 5 खासगी ठराव मांडण्यात येणार असून कोरोना संकटामुळे जनतेसाठी हे अधिवेशन खुले ठेवण्यात आलेले नाही. फक्त प्रसार माध्यमांना ते खुले आहे.
शेळ – मेळावली येथील आयआयटी प्रकल्प व नगरपालिका अध्यादेश प्रकरणी सरकारला धारेवर धरण्याचे विरोधी पक्षांनी ठरवले होते. तथापि ते दोन्ही विषय सरकारने मागे घेऊन संपवले असले तरी म्हादई, आमदार अपात्रता, कोळसा हाताळणी, लोकायुक्त दुरुस्ती, मोले वीज प्रकल्प, नवीन मोटार वाहन कायदा या व इतर अनेक विषयांवर सरकारला जाब विचारण्याचे विरोधी पक्षांनी निश्चित केले आहे. त्यामुळे सरकारची देखील कसोटी लागणार आहे.