मुलांच्या स्वागतासाठी शाळा व्यवस्थापन सज्ज, मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक
प्रतिनिधी /पणजी
आज सोमवार दि. 21 फेब्रुवारीपासून पहिली ते बारावी इयत्तेच्या शाळा सुरू होत असून त्याची सर्व तयारी शाळा प्रमुख तसेच व्यवस्थापनाने केली आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेले दीड ते दोन वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शाळा चालू होत असून मुलांच्या स्वागतासाठी शाळेतील शिक्षक, व्यवस्थापन सज्ज झाले आहे. काही शाळेत मुलांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून त्यांना मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतराचे पालन करावे लागणार आहे. आजपासून शाळेची घंटा वाजून त्या मुलांनी गजबजणार आहेत.
चालू शैक्षणिक वर्ष 2021-2022 आता अंतिम टप्प्यात आणि संपण्याच्या मार्गावर असून ते संपता संपता मुलांना शाळेत पाचारण करण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांची परीक्षा देखील प्रत्यक्ष हजेरीत म्हणजे ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याने मुलांना आता शाळेत जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. केवळ महिनाभर कालावधीची शाळा शिल्लक राहिली असून त्यासाठी मुलांना शाळेत यावे लागणार आहे आणि पालकांना त्यांना शाळेत सोडावे लागणार आहे.
कोरोनाचा संसर्ग, बळींचे सत्र आता थोडेफार कमी झाले असले तरी ते संकट पूर्णपणे टळलेले नाही. अशा परिस्थितीत अनेक राज्यांनी नियमितपणे शाळा सुरु केल्या असून त्याचा परिणाम म्हणून दखल घेऊन राज्य सरकारने व प्रमुख्याने शिक्षण खात्याने शाळा नियमितपणे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
शाळा अनेक महिने बंद असल्यामुळे अनेक पालकांनी मुलांसाठी गणवेशच शिवला नाही ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन मुलांना गणवेशाची सक्ती करण्यात आलेली नाही. नियमित वापरातील साधे कपडे घालून शाळेत येण्याची अनुमती देण्यात आली आहे. यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे. शाळा सुरू करण्यास पालकवर्ग किती प्रतिसाद देतो हे महत्त्वाचे असून मुलांची गर्दी होऊ नये म्हणून मुलांना दिवसातून दोनवेळा किंवा एक दिवसाआड बोलावण्याची सूचना शिक्षण खात्याने केली आहे. सॅनिटायझरची सोय बहुतेक सर्व शाळांमधून आपापले वर्ग, कार्यालय, मुलांची बसण्याची जागा हे सर्व सॅनिटायझरने स्वच्छ केले आहे. काही शाळांमधील मुलांच्या परीक्षा चालू असून त्यांच्या परीक्षा संपल्यानंतर त्यांना नियमितपणे शाळेत बोलावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.