दरवर्षी 21 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त हा लेख…
भारत हा लोकशाही देश आहे. बहुभाषिकता ही भारताची प्राचीन काळापासूनची विशेष ओळख आहे. भारत हा जगात दुसऱया क्रमांकाचा भाषिक वैविध्य असलेला देश आहे. भारतात एकूण 780 भाषा बोलल्या जातात. त्यापैकी सर्वात जास्त म्हणजे 90 भाषा अरुणाचल प्रदेशात बोलल्या जातात. महाराष्ट्रात 39 भाषा बोलल्या जातात. लोकशाहीत प्रत्येक नागरिकासमवेत प्रत्येक भाषेचा सन्मानही महत्त्वाचा आहे.
हजारो वर्षांपासून आदान-प्रदान, शब्दांची देवाण-घेवाण आपल्या भाषांनी सामावून घेतली आहे. एक राष्ट्रभाषा किंवा राज्यभाषा ही प्रशासन, विधी, कायदे, दळणवळण यांच्यात सुसूत्रता आणण्यासाठी ठीक आहे. पण त्यातून इतर भाषांवर अन्याय होणार नाही याची दखल राज्यकर्त्यांनी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
धार्मिक आधारावर भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान ही दोन राष्ट्रे अस्तित्वात आली. पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा बांगला देश आणि पश्चिम पाकिस्तान (आजचा पाकिस्तान) अशा दोन भागात पाकिस्तान विभागलेला आहे. धार्मिक आधारावर स्वतंत्र होताच पाकिस्तानने लादलेल्या उर्दू भाषेविरुद्ध पूर्व पाकिस्तानात (बांगला देश) असंतोष भडकला. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर बंगालमध्ये भाषेच्या गळचेपीविरुद्ध लोकशाही लढा सुरूच राहिला आणि 21 फेबुवारी 1952 रोजी पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात 5 जण ठार तर शेकडो जखमी झाले. परिणामी पुढे 1956 मध्ये पाकिस्तानने ‘बांगला’ भाषेला अधिकृत राजभाषा म्हणून मान्यता दिली. पण भाषेचे खच्चीकरण सुरूच ठेवले. अखेर 1971 मध्ये गृहयुद्ध होऊन ‘स्वतंत्र बांगला’ देश अस्तित्वात आला. बांगला देशात आजही 21 फेब्रुवारी हा मातृभाषा दिन आणि शहीद दिन म्हणूनच ओळखला जातो.
मातृभाषा म्हणजे आईची भाषा होय. तिलाच आपण मायबोली असेही म्हणतो. मूल आईच्या पोटात असताना जी भाषा ऐकत ऐकत जन्माला येते ती त्या मुलाची मातृभाषा मायबोली असते. आईचा आवाज पोटात असणाऱया बाळाला सहज आणि स्पष्टपणे ऐकू येत असतो. आईचे महत्त्व अनादी काळापासून आहे. आई जी भाषा बोलते त्याच भाषेची आणि मुलांची गट्टी जमते आणि मूल जे काही ज्ञान आत्मसात करते ते प्रामुख्याने मातृमुखातूनच! मातृभाषेला म्हणजेच मायबोलीला मुलांच्या भावविश्वात महत्त्वाचे स्थान असते. त्यामुळेच मुलांच्या बौद्धिक, भावनिक, मानसिक विकासाला चालना मिळून त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाला दिशा मिळते. त्यालाच आपण संस्कार म्हणतो.
ज्ञानक्षेत्रात मातृभाषेला महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षणाचे माध्यम ‘मातृभाषा’ असेल तर विद्यार्थ्याला ज्ञानग्रहणात कमी अडथळे येतात. आपला मेंदू आपल्यालाही नकळत आपल्या मायबोलीतच विचार करत असतो. म्हणजेच माणसाच्या भावनिक, मानसिक, आत्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक इत्यादी विकासात त्याची मायबोली त्याला मदतरूप ठरू शकते.
‘बोली भाषा’ हा विषय जरा वेगळा आहे. बऱयाचदा आपल्याला वाटते की खेडय़ातील माणसे जी बोलतात ती बोली आणि शहरातील माणसे जी बोलतात ती प्रमाणभाषा. परंतु ते तसे नाही. शहरातील आणि खेडय़ातील माणसेही बोलीच बोलतात. फक्त पुस्तकांतील किंवा वर्तमानपत्रातील छापील भाषा ही ‘प्रमाणभाषा’ असते. शहरातील माणसे, घरात जी भाषा बोलतात ती बोली भाषाच असते. पर्यायाने बोली म्हणजे बोलली जाणारी भाषा होय.
आत्मविश्वासाने मराठीत ग्रामीण बोलीतली कविता आली ती बहिणाबाई चौधरींची कविता! त्या निरक्षर असल्याने मराठी भाषेतली प्रमाणभाषा येण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे त्यांची कविता आपोआपच पूर्णपणे बोली (खानदेशी वऱहाडी) तून आली. त्यांची ही कविता म्हणजे अस्सल बावनकशी सोनं आहे. आपल्याला इंग्रजी फाडफाड बोलता आले तरच आपण स्मार्ट! असे सध्या अनेकांना वाटते. परिणामी दुर्दैवाने इंग्रजी माध्यमांच्या शाळांना ऊत आला. त्यामुळे आधी पालकांना, मग मुलांना मातृभाषा बोलण्याची लाज वाटू लागली आहे. साहजीकच मातृभाषेचे स्थान कमी होत चालले आहे. नवीन पिढीला मायबोली ग्राम्य व गावंढळ वाटणार नाही याची काळजी राज्यकर्ते व समाजाने घ्यायला हवी.
– प्रा. चंद्रकांत कदम
(संदर्भ मराठी अभ्यास परिषद पत्रिका भाषा आणि जीवन)