ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ठाकरे सरकारने शुक्रवारी 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहेत. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.
यावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपला शब्द फिरवत असून आज जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे असल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आजच्या पॅकेजवर फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
ते म्हणाले, बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना, त्यांनी निव्वळ बहाणे शोधले. शेतकर्यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता त्यांनी जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी आहे. यापूर्वी 25,000 रुपये आणि 50,000 रूपये हेक्टरी मदतीची मागणी त्यांनीच केली होती. फळबागांसाठी तर एक लाखांपर्यंत मदत त्यांनी मागितली होती. पण, आता ती मदत द्यायची नाही, म्हणून केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करीत आहेत.
किमान शेतकर्यांच्या बाबतीत तरी आणि झालेल्या नुकसानीची तीव्रता पाहता अशा काल्पनिक आकड्यांची धूळफेक मुख्यमंत्री करतील, असे वाटले नव्हते. हा शेतकर्यांसोबत झालेला मोठा विश्वासघात आहे. निसर्गाने तर अन्याय केलाच, आता सरकारही सूड घेत आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.