राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अबाधित राहणार की भाजपा मुसंडी घेणार
प्रतिनिधी/ सातारा
जिह्यातील 246 ग्रामपंचायतीसाठी मतदान चुरशीने झाले असल्याने जिह्यात सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात सत्ता अबाधित राहणार की भाजपा-शिंदे गटाच्या ताब्यात ग्रामपंचायती जाणार हे मंगळवारी मतमोजणीवेळी स्पष्ट होणार आहे. राज्यात सध्या जे राजकीय वातावरण सुरु आहे त्याचा परिणाम ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत होईल की स्थानिक गावकी-भावकीचे राजकारण दिसून येईल हे मंगळवारच्या निकालावरुन स्पष्ट होणार आहे. आपल्या गावचा कारभारी कोण असेल त्याकडे सगळय़ांच्याच नजरा लागून राहिलेल्या आहेत.
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. गावोगावी ग्रामपंचायतींवर सत्ता ही राष्ट्रवादीच्या विचारांचीच दिसून येते. त्यामध्ये सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱयाचे असल्याने शिंदे गटासाठी ही ग्रामपंचायत निवडणूक महत्वाची आणि प्रतिष्ठेची समजली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीनेही गावोगावी महाविकास आघाडीचीच सत्ता कशी राहिल यासाठी आटोकाट प्रयत्न सुरु ठेवले आहेत. गावपातळीवर पॅनेल टाकताना आघाडय़ांचे पॅनेल टाकले गेले आहेत. त्यामुळे जिह्यात ग्रामपंचायतीच्या झालेल्या मतदानांच्या आकडेवारीवरुन चुरशीने मतदान प्रत्येक गावात झाल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये शिंदे गटाचे आमदार महेश शिदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, भाजपाचे आमदार जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे यांनीही गाव पुढाऱयांना पाठबळ दिले. आमदार महेश शिंदे यांच्या भगिणी स्वतः गावागावात फिरत होत्या. त्यांचे विरोधक असलेले राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनीही त्यांच्या गावपुढाऱयांना पाठबळ दिले आहे. त्यामुळे कोरेगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणूक चांगलीच गाजली. विशेष करुन कुमठे हे गाव राष्ट्रवादीचे समजले जाते. त्या गावामध्ये राष्ट्रवादीचे कोरेगाव पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे हे आक्रमक स्वभावाचे असून त्यांनी ही निवडणूक चांगलीच गाजवली. आमदार महेश शिंदे यांच्याही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नितीपुढे आपली राजकीय खेळी सुरुच ठेवली. तसेच देगाव असेल क्षेत्रमाहुली असेल येथेही आमदार महेश शिंदे यांच्या भगिणी डॉ. अरुणा बर्गे यांनी स्वतः लक्ष घातले होते. विरोधकांनी त्यांची गाडी अडवून त्यांना गावात येण्यास मज्जाव करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याही खंबीरपणे गावात पोहचल्या होत्या. त्यांच्याबाबत विरोधात सोशल मीडियावर रान पेटवले गेले तरीही त्या स्थानिक गावात नेमके काय घडले हे तेथील स्थानिकांना चांगलेच ज्ञात असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, राज्याच्या राजकारणामध्ये सध्या सुरु असलेले महाविकास आघाडीचे मोर्चे, सत्ताधाऱयांवर एकच होत असलेला आरोप, तर सत्ताधारी शिंदे आणि भाजपाकडून सुरु असलेली साखरपेरणी याचा ग्रामपंचायत निवडणुकीत किती परिणाम होणार हे मंगळवारच्या निकालावरुन स्पष्ट होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या राहतील की शिंदे-भाजपा गट मुसंडी मारेल याकडे सगळय़ांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
गुलाल आमचाच
निवडणूक निकाल ऐकण्यासाठी उमेदवारांचे व पॅनेलचे कार्यकर्ते गुलाल घेऊन तयार आहेत. गावोगावी कार्यकर्त्यांमध्ये बीट लागलेल्या असून आमचेच पॅनेल येणार, आमची सत्ता येणार असा दावा केला जात आहे. मंगळवारी लागणाऱया निकालाकडे सगळय़ा नजरा लागून राहिल्या आहेत.