लहानपणी वर्तमानपत्रात आणि पाठय़पुस्तकात पाहिलेली नेहरूंची देखणी छायाचित्रे आठवतात. पोस्टाच्या एका तिकिटावर नेहरू आणि केनेडी यांच्या देखण्या छब्या आठवतात. किशोरवयात संयुक्त महाराष्ट्रासाठीची चळवळ, आचार्य अत्र्यांनी नेहरूंवर कडाडून केलेली टीका आणि चीनच्या युद्धातील पराभवानंतर देशभर झालेला आक्रोश आठवतो. चीनच्या पराभवानंतर पुण्याच्या एका दौऱयात उघडय़ा मोटारीतून गेलेले आणि रस्त्याच्या कडेला गर्दीत उभे राहून पाहिलेले म्लान नेहरू आठवतात. नेहरूंच्या निधनानंतर आचार्य अत्र्यांनी मराठा दैनिकात लिहिलेली ‘सूर्यास्त’ ही अग्रलेखांची मालिका आठवते. मरणानंतर वैर संपते हे सांगणारी आपली संस्कृती. हल्ली सोशल मीडियात ट्रोलगुंडांच्या टोळय़ा अवतरल्यापासून हे ब्रीद लयाला गेले आहे. तरुण वाचकांना कदाचित कमी ठाऊक असलेल्या दोन आठवणी… स्वतः साम्यवादी असलेल्या भगतसिंग यांनी नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्या समाजवादी भूमिकेवर 1928 साली ‘नये नेताओं के नये विचार’ हा लेख लिहिला होता. ते लाहोरच्या तुरुंगात असताना नेहरूंनी त्यांची आवर्जून भेट घेतली आणि त्यांना कायदेशीर सहाय्य दिले. प्रत्यक्ष फाशीच्या दिवशी त्यांनी आपल्या वकिलाला विनंती केली की कायदेशीर सहाय्य दिल्याबद्दल नेहरू आणि सुभाषबाबूंचे आभार मानावेत. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांच्या भेटीनंतर नेहरूंनी काढलेले उद्गार. ‘त्यांचे हाल पाहून मी अतिशय दु:खी झालो आहे. त्यांनी या संघर्षात आपले प्राण पणाला लावले आहेत. त्यांना राजकीय कैदी म्हणून वागणूक मिळायला हवी. त्यांच्या त्यागाला यश मिळेल अशी मला आशा वाटते.’ नेहरूंच्या निधनानंतर अटलजींनी राज्यसभेत काढलेले उद्गार थोडक्मयात, ‘एक स्वप्न भंगले आहे, एक गाणे शांत झाले आहे, एक ज्योत विझली आहे… भारतमाता आज दु:खमग्न झाली आहे. तिने आपला राजपुत्र गमावला आहे. मानवता शोकाकुल झाली आहे, तिचा सेवक हरपला आहे. आज शांतता अस्वस्थ आहे, तिचा संरक्षक गेला आहे. त्यांनी अहिंसेचा पुरस्कार केला, पण स्वातंत्र्य आणि सन्मानाच्या रक्षणार्थ प्रत्येक शस्त्राचाही पुरस्कार केला. ते व्यक्तिगत स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते आणि आर्थिक समतादेखील त्यांना हवी होती…
नेता गेला आहे, अनुयायी उरले आहेत. सूर्यास्त झाला आहे. नक्षत्रांच्या उजेडात आपल्याला मार्ग शोधायचा आहे. बलवान आणि समृद्ध भारत साकार करण्यासाठी आपण सर्वांनी स्वतःला झोकून दिले तर जागतिक शांततेसाठी ते योगदान ठरेल, नेहरूंना ती खरी श्रद्धांजली ठरेल.’