आंबा वाहतुकीच्या ट्रक चालकासह चाकरमान्यावरही गुन्हा
वार्ताहर / कट्टा:
मुंबई वाशी मार्केटला आंब्याचा ट्रक घेऊन गेला असता परत येताना आपल्या चाकरमानी मित्राला घेऊन आल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी ट्रक चालकासह अन्य एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ट्रक आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. यापूर्वी दोन बोलेरो जप्त करीत चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. असे असताना पुन्हा मुंबईच्या चाकरमान्याला घेऊन आल्याचा प्रकार समोर आला आहे.
देवगड तालुक्यातून आंबा वाहतूक करणारा ट्रक घेऊन नांदोस-गावकरवाडी येथील चालक दत्ताराम मोहन गावडे (28) हा सहा एप्रिलला मुंबई-वाशी मार्केटला घेऊन गेला होता. सात एप्रिलला ट्रक देवगडला परत आला. तेथून चालक आपला चाकरमानी मित्र संदेश धोंडी गावडे (29, रा. नांदोस वरची सारंगवाडी) याला सोबत घेऊन दुचाकीने आठ रोजी नांदोस येथील आपल्या गावी आला होता. गावात मुंबई येथून व्यक्ती आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे तपासाची सूत्रे फिरली.
दोघांची चौकशी
नांदोसमध्ये पोलीस तात्काळ दाखल होत त्यांनी मुंबईहून आलेल्या दोघांची चौकशी केली. यात ट्रक आणि दुचाकी याद्वारे ते गावी आल्याचे स्पष्ट झाले. यामुळे पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांवरही कट्टा पोलीस दूरक्षेत्राने कारवाई करत गुन्हा दाखल केला. सदरच्या प्रकरणासाठी चौधरी यांनी खास टीम नियुक्त करून रात्री उशिरापर्यंत कारवाई पूर्ण केली होती.
ट्रक व दुचाकी जप्त
गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री उशिरा मालवण पोलीस पथकाने देवगडला जात ट्रक (एमएच-07/एस-1099) जप्त केला आहे. तर दुचाकी (एमएच-07/ एएफ-0295) ही दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई आर. व्ही. मुंढे, योगेश सराफदार, राजन पाटील, मंगेश माने यांनी केली.
पासधारकांना माहिती सादर करण्याचे आदेश
कृषी विभागाकडून अत्यावश्यक सेवा म्हणून अनेकांना ट्रक, टेम्पो, बोलेरो तसेच अन्य वाहनांना पास देण्यात आले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसात केलेल्या चौकशीत या पासचा गैरवापर होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे मालवणातील कृषी विभागाच्या पासधारकांना सर्व कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश पोलिसांच्यावतीने देण्यात आले आहेत.