आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर : मध्यमवर्गीय, युवांमधील मृत्यूचे प्रमाण चिंताजनक
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोनाची दुसऱया लाट पसरत असून मोठय़ा प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने नवी कोरोना मार्गसूची जारी केली आहे. राज्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी लसीकरण मोहीमही गतिमान सुरू आहे. राज्यात आतापर्यंत 48.5 लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली असून कर्नाटक लसीकरण मोहिमेत देशात 6 व्या क्रमांकावर आहे. असे असले तरी कोरोनामुळे युवा वर्ग व मध्यमवर्गीयांचा मृतांचा आकडा वाढत असून परिस्थिती गंभीर बनली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.
डॉ. सुधाकर पुढे म्हणाले, राज्यात सोमवारअखेर 48.5 लाख नागरिकांना लसीकरण करण्यात आले असून सोमवारी 1 लाख 95 हजार 554 नागरिकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत 60 वर्षांवरील 22 लाख व 45 ते 59 वर्षांवरील 10.4 लाख नागरिकांनी लस घेतली आहे. देशात राज्यांतर्गत लसीकरणामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालनंतर कर्नाटक 6 व्या स्थानी आहे. नुकताच केंद्र सरकारने राज्याला आणखी 15 लाख लसीचा पुरवठा केल्याचे
त्यांनी सांगितले.
दुसरी लाट तीव्र गतीने पसरतेय
देशभरात सोमवारी एका दिवसात तब्बल 1 लाखांवर रुग्ण आढळून आले असून 478 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातही रुग्णवाढीसह मृत्यूचे प्रमाणही वाढले असून सोमवारी 32 जणांचा मृत्यू झाला आहे. मध्यमवर्गीय व 25 वर्षांवरील युवा वर्गामधील मृत्यूचा आकडा चिंताजनक आहे. यासाठी मृत्यूचे ऑडिट करावे, असा सल्ला कोरोना तांत्रिक समितीला देण्यात आला आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट तीव्र गतीने पसरत आहे. मात्र, कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना केल्याचे डॉ. सुधाकर यांनी सांगितले.
नागरिकांनी नियमांचे पालन कारावे
मुख्यमंत्री युडियुराप्पा कोरोना नियंत्रणाबाबत सर्वांशी चर्चा केली असून त्यानुसारच नवी कोरोना मार्गसूची जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीमुळे विकेंड लॉकडाऊन व कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे कर्नाटकात अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन न केल्यास परिस्थिती गंभीर बनू शकते. त्यामुळे आणखी कडक उपायोजना कराव्या लागतील. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे डॉ. सुधाकर यांनी सांगितले.
आरोग्य कर्मचाऱयांनी लसीकरणाबाबत जागृती करावी
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर कोरोना होणार नाही, असे नाही. मात्र, त्याची तीव्रता कमी होते. पण, अनेकांना लस न घेतल्याने कोरोनाची बाधा झाली असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले आहे. त्यामुळे लसीकरण किती महत्त्वाचे आहे, हे यावरून स्पष्ट होते. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे. त्याचबरोबर आरोग्य कर्मचाऱयांनीही लस घेऊन नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जागृती निर्माण करावी, असे आवाहनही डॉ. सुधाकर यांनी केले.
खासगी रुग्णालयांना 20 टक्के बेड्स ठेवण्याची सूचना
राज्यात 33 हजार 697 बेड्स कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनसह 15 हजार 733 बेड्स असून यापैकी 10 हजार 83 बेड्स कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तर खासगी रुग्णालयांना 20 टक्के बेड्स राखीव ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे, असे डॉ. सुधाकर यांनी सांगितले.