कायदा मोडणाऱयांवर कठोर कारवाई : जिल्हाधिकाऱयांचा इशारा
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालल्यामुळे आता रविवारी पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आदेश काढला असून 5 जुलै ते 2 ऑगस्टपर्यंतचे सर्व रविवार पूर्णपणे बंद असणार आहेत. शनिवार दि. 4 रोजी रात्री 8 पासून या लॉकडाऊनला प्रारंभ होणार असून सोमवार दि. 6 रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. केवळ जीवनावश्यक वस्तू विक्री व खरेदी करण्याची मुभा देण्यात आली आहे. तेव्हा कोणीही नियम तोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
संपूर्ण राज्याबरोबर जिल्हय़ातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात केवळ दूध, औषध, फळे, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तू खरेदी-विक्रीसाठी मुभा राहणार आहे. तेव्हा कोणीही काम नसताना रस्त्यावरून फिरण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही आदेशात म्हटले आहे.
लग्न समारंभासाठी रविवारी केवळ 50 जणांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. इतर कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. शहरामध्ये विनाकारण दुचाकी किंवा चार चाकी घेऊन फिरण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर भा.दं.वि. 188 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येईल, अशा इशारादेखील देण्यात आला आहे.
रविवारी पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात येणार आहे. तेव्हा जीवनावश्यक वस्तू वगळता इतर कोणत्याही दुकानदाराने दुकाने उघडू नयेत, अशी सूचना करण्यात आली आहे. याबाबत पोलीस आयुक्त, उपायुक्त, प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच इतर अधिकाऱयांना कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदी करतानाही सुरक्षित अंतर तसेच मास्कचा वापर करावा लागणार आहे. कोणीही मास्क नसताना आल्यास त्याला कोणत्याही वस्तू दुकानदाराने देवू नये, असे कळविण्यात आले आहे. कोरोनाची बाधा अधिक प्रमाणात होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक रविवार लॉकडाऊन राहणार आहे. तेव्हा नाहक रस्त्यांवरुन कोणीही फिरु नये. अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.