गौरी आवळे / सातारा :
महिला, बालक, वयोवृद्ध आणि इतर कोणी ही अडचणीत सापडल्यावर फक्त 100 नंबर डायल करताच मदत मिळत होती. परंतु या नंबर ऐवजी आता डायल 112 या नव्या नंबरची घोषणा झाली. हा नंबर कधी कार्यान्वित होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. तोच नंबर 27 सप्टेंबरपासून जिल्ह्यात प्राथमिक स्तरावर सुरू झाला आहे. या नंबरवर सर्वात जास्त कौटुंबिक हिंसाचाराचे फोन येत असल्याचे जिल्हा पोलीस दलाकडून सांगण्यात येत आहे.
छेडछाड, मारामारी, कौटुंबिक हिंसाचार, खून, लुटमारीच्या घटना आणि वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण नेहमीच सामान्य नागरिकांना विचार करायला भाग पाडत असते. आता दिवसाही गुन्हे घडु लागल्याने सुरक्षितता आहे कुठे? असा प्रश्न सर्वापुढे उभा आहे. ही सुरक्षिता वाढावी म्हणून हेल्पलाईनचा 100 ऐवजी 112 नंबर कार्यान्वित करण्यात आला आहे. या बदलत्या नंबर सोबत अनेक सोयी-सुविधा वाढविण्यात आल्या आहेत. सातारा जिह्यात 27 सप्टेंबर पासून प्राथमिक स्तरावर हा नंबर सुरू झाला आहे. महेंद्र डिफेन्स या कंपनीशी पाच वर्षाचा करार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कोणत्याही भागातून पिडित महिलेने फोन केल्यास तात्कळ नंबर कंट्रोल रूम कडे पाठविण्यात येतो. 34 चारचाकी गाडय़ा व 64 दुचाकी गाडय़ा जिल्ह्यात मदतीचे काम करत आहेत. प्रत्येक गाडीत टॅबलेट फोन आहे. अवघ्या 10 सेंकदात महिलेचा कॉल कंट्रोल रूम पर्यंत पोहचत असल्याने ही महिला ज्या ठिकाणी अडचणीत सापडली आहे. तिथे इमजन्सी रिसपॉन्स व्हेईकल पाठविण्यात येते. आणि महिलेला अडचणीतून बाहेर येण्यास मदत होते. सातारा जिल्ह्यातील कंट्रोल रूमला 16 पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. शहरातील प्रत्येक भागात पोलीस चौकी आहे. पोलीसांचे पेट्रोलिंग सुरू असते. तसेच नव्याने दाखल झालेल्या बीट मार्शल कार्यरत आहे.
कौटुंबिक हिंसाचाराचे फोन जास्तच…
27 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या 112 या हेल्पलाईनवर आतापर्यंत छेडछाडीपेक्षा कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणाऱ्या महिला चे सर्वाधिक फोन आले आहेत. दिवसाला 10 ते 15 महिला फोन करून मदत मागत आहेत. यामुळे फक्त लॉकडाऊन काळात नव्हे तर अनलॉक मध्येही कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण जास्त असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात येत आहे.
100 नंबर ही सुरूच
हेल्पलाईनचा नंबर 100 बदलून 112 करण्यात आला आहे. हा नंबर सूरूही झाला आहे. तरीही लगेच 100 नंबर बंद झालेला नाही. तो अद्यापही सुरू आहे. 100 नंबर हा अनेक वर्षापासून कार्यरत आहे. यामुळे नागरिकांना 112 नंबरची माहिती होईपर्यंत गरज पडल्यास 100 नंबर ही डायल केल्यास तात्काळ मदत पोहचणार आहे. या 100 नंबर वरील सर्व कॉल 112 नंबरकडे वळविण्यात येत आहेत.