संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचे विधान : कोविड-19 महामारीदरम्यान चीनची आगळीक : भारताचे चोख प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ हैदराबाद
चीनसोबतचा सीमावाद भारताने ज्याप्रकारे हाताळला ते पाहता आपल्या देशाने कमकुवत नसल्याचे सिद्ध करून दाखविले आहे. सीमेवरील उल्लंघन, आक्रमकता तसेच कुठल्याही प्रकारच्या एकतर्फी कारवाईला चोख प्रत्युत्तर दिले जाणार असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी शनिवारी म्हटले आहे. भारत आणि चीन यांच्यातील तणाव संपुष्टात आणण्यासाठी अनेक टप्प्यांमध्ये चर्चा झाली आहे.
हैदराबाद येथील डिंडीगुल वायुतळावर संयुक्त परेडला त्यांनी संबोधित केले आहे. भारत वादांवर शांततापूर्ण पद्धतीने तोडगा काढण्यावर विश्वास ठेवतो, परंतु देशाच्या आत्मसन्मानाला कुठल्याही प्रकारचा धक्का सहन केला जाणार नसल्याचे राजनाथ म्हणाले.
कोविड-19 महामारीदरम्यान चीनच्या वर्तनाने त्याचे हेतू उघड झाले आहेत. परंतु आम्ही भारत कमकुवत नसल्याचे जगासमोर सिद्ध केले आहे. हा नवा भारत असून तो सीमेवरील उल्लंघन, आक्रमकता तसेच कुठल्याही प्रकारच्या एकतर्फी कारवाईला ठोस प्रत्युत्तर देणे जाणतो असे उद्गार संरक्षणमंत्र्यांनी काढले आहेत.
भारताला याप्रकरणी अनेक देशांचे समर्थन मिळाले असून कौतुकही झाले आहे. तणावावर तोडगा काढण्यासाठी राजनयिक तसेच सैन्यस्तरावर अनेक टप्प्यांमध्ये चर्चा पार पडली आहे. आम्ही संघर्ष इच्छित नाही, परंतु देशाचा आत्मसन्मान सर्वोपरि आहे. कुठल्याही स्थितीचा सामना करण्यासाठी भारत तयार आहे. सीमेवर पाकिस्तान किरकोळ संघर्ष घडवून आणू पाहत आहे. चार युद्धांमध्ये भारताकडून पराभूत होऊनही पाकिस्तान दहशतवादाचा वापर करत छुपे युद्ध छेडत आहे. परंतु भारतीय सैन्यदल आणि पोलीस दहशतवादाला योग्यप्रकारे सामोरे जात असल्याचे राजनाथ सिंग म्हणाले.
भारताने केवळ देशातील दहशतवादाचा योग्यप्रकारे मुकाबला केला असे नाही नंतर प्रसंगी सीमा ओलांडून कारवाईही केली आहे. ही कारवाई भारताची सैन्यशक्ती आणि दहशतवादविरोधी निर्धार जगाला दर्शवित असल्याचे राजनाथ यांनी म्हटले आहे.