1 कोटी लोकांना प्रशिक्षण देणार : जिल्हा कौशल्य समित्यांना प्राधान्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकार पुढील महिन्यात पंतप्रधान कौशल्य विकास योजनेचा (पीएमकेवीवाय) तिसरा टप्पा सुरू करणार आहे. कौशल्य विकासमंत्री महेंद्रनाथ पांडे यांनी यावेळी योजनेत जिल्हा कौशल्य समित्यांना मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगितले आहे. स्थानिक गरजांना कौशल्य कार्याशी जोडून त्यानुसार अभ्यासक्रम तयार करण्यावर त्यांनी भर दर्शविला आहे.
सरकारने पीएमकेवीआय योजना 2015 मध्ये सुरू केली होती आणि 2016 मध्ये त्यात सुधारणा करण्यात आली होती. 2020 पर्यंत एक कोटी लोकांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य बाळगण्यात आले आहे.
योजनेचा उद्देश
प्रशिक्षणाचा लाभ घेऊन स्वयंरोजगार किंवा नोकरी करता येणार आहे. याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत कुशल कामगारांना शासकीय स्तरावरही नोकरी मिळवून देण्याचे प्रयत्न केले जातात. या योजनेच्या अंतर्गत 11 नोव्हेंबरपर्यंत देशभरात 69 लाखाहून अधिक जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
नोंदणी कशी करणार?
योजनेकरता अर्ज करण्यासाठी ‘पीएमकेवीवायऑफिशियल डॉट ओआरजी’वर नाव, पत्ता आणि ईमेल इत्यादी माहिती भरावी लागते. यानंतर अर्जदार ज्या तांत्रिक क्षेत्रात प्रशिक्षण प्राप्त करू शकतो, त्याची निवड करावी लागणार आहे. यात बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर, अन्नप्रक्रिया, फर्निचर आणि फिटिंग, हस्तकला, रत्नालंकार आणि चर्मोद्योगविषयक तंत्रज्ञान यासारखी सुमारे 40 क्षेत्रे उपलब्ध करण्यात आली आहेत. पसंतीच्या तांत्रिक क्षेत्रासह अतिरिक्त क्षेत्राची निवड करावी लागणार आहे.
1.5 लाखाचे कर्ज उपलब्ध
योजनेच्या अंतर्गत सरकार 1.5 लाख रुपयांचे कर्जही उपलब्ध करते. या योजनेत नोंदणी करण्यासाठी उच्चमाध्यमिकपर्यंत शिक्षण घेतलेल्यांना पात्र ठरविण्यात आले आहे. या योजनेच्या अंगर्तत प्रशिक्षण घेणाऱयांसाठी सरकारकडून रोजगारमेळय़ाचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक 6 महिन्यांच्या कालावधीत याचे एकदा आयोजन होते.