चालकाला झोपेच्या गोळय़ा देऊन पळवितात वाहने : गुन्हेगार सुमारे 500 किलोमीटरपर्यंत करतात प्रवास
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या आठवडय़ात चिकोडी पोलिसांनी आंतरराज्य गुन्हेगारांच्या टोळीतील एका त्रिकुटाला अटक केली आहे. अलीकडे गुन्हेगारी प्रकरणांचा तपास लक्षात घेता बेळगाव शहरापेक्षा जिल्हय़ातील पोलीस तपासात आघाडीवर आहेत, हे दिसून येते. चिकोडी पोलिसांनी अटक केलेल्या त्रिकुटाची कहाणी एखाद्या चित्रपटातील कथानकासारखीच आहे.
प्रत्येक गुन्हेगाराची गुन्हा करण्याची ठरावीक पद्धत असते. चोरी करणाऱया प्रत्येक गुन्हेगाराची आपली स्वतःची एक पद्धत रुढ झालेली असते. ज्याला पोलिसी भाषेत ‘मोडस ऑपरंडी’ असे म्हणतात. कोण कडीकोयंडा तोडून चोरी करतात किंवा आणखी कोण खिडकीचे ग्रिल काढून अथवा वाकवून घरात प्रवेश करतात. खिडकीतून चोरणारा गुन्हेगार दरवाजा उघडा असला तरी तो घरात प्रवेश करत नाही. तो खिडकीतून आपले काम साधतो.
चिकोडी पोलिसांनी अटक केलेल्या त्रिकुटाची गुन्हेगारीची पद्धत थक्क करणारी आहे. महामार्गावर वाहनांची चोरी नेहमीचीच असते. एखादा चालक जेवणासाठी ढाब्यावर आपले वाहून उभे करून गेला असेल तर ते वाहन त्यातील मालासकट पळविले जाते. या टोळीची मोडस ऑपरंडी वेगळीच आहे. हे चालकाला धरूनच वाहन पळवितात. त्याला खाऊपिऊ घालून विश्वास संपादन करतात. चार-पाचशे किलोमीटरपर्यंत त्या वाहनात प्रवास करतात. एकदा चालकाला विश्वास बसला की त्याला चहामधून झोपेच्या गोळय़ा देऊन चालकाला झोपवून त्याचे वाहन पळवितात.
जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली चिकोडीचे पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून या टोळीचा छडा लावला आहे. त्यांच्याजवळून 35 लाख रुपये किमतीचे सिएट कंपनीचे टायर व 25 लाख रुपये किमतीची कॅडबरी बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत.
उपलब्ध माहितीनुसार ट्रक किंवा कंटेनरमध्ये जिथे माल भरला जातो तिथे हे गुन्हेगार पोहोचतात. अबिद जुम्मेखान (वय 32) रा. झारोखडी, हरियाणा, अश्विन शांतीलाल जैन (वय 42) रा. पाडीन, राजस्थान, सध्या राहणार चेल्लीकेरी-चित्रदुर्ग, रिजवान नुरुद्दीन बिसेंबरा (वय 22) रा. बिसेंबरा, जि. मथुरा, उत्तरप्रदेश हे त्रिकूट अशा कामात इतके चलाख आहेत की, सहजपणे ट्रक किंवा कंटेनर चालकाला झोपवून लाखो रुपयांचा माल ते लांबवतात. टायर चोरीचा प्रकार कसा घडला? याचे उलगडलेले रहस्य मनोरंजक आहे.
जिथे ट्रकमध्ये माल लोड केला जातो. तेथेच हे त्रिकुट जाते. चेन्नई येथून सिएट कंपनीचे टायर घेऊन येणाऱया कंटेनर चालकाला कारखान्याबाहेरच गाठण्यात आले. अबिद व रिजवान हे दोघे व्यवसायाने ट्रकचालक आहेत. आमचेही कंटेनर आतमध्ये उभे आहेत. माल लोड व्हायला चार-पाच दिवस लागणार आहेत, असे सांगत चालकाशी दोस्ती करतात. ‘भाऊ तुम्ही कोठे जाणार आहे?’ अशी विचारणा करतात. ट्रक जेथे जाईल आपणही त्याच परिसरात येणार आहोत, अशी थाप मारतात.
माल भरलेला ट्रक तेथून सुटला, की चालकाची सरबराई ते स्वतः करतात. जेवणखाण, रात्रीच्यावेळी गाडी थांबली की दारुची व्यवस्थाही करतात. सुमारे 500 किलोमीटरपर्यंत प्रवास त्याच्यासोबत करतात. त्यामुळे चालकाला त्यांच्यावर विश्वास बसतो. याच संधीचा फायदा घेत हे गुन्हेगार त्यांचा विश्वासघात करतात. झोपेच्या गोळय़ा देऊन त्यांचा ट्रक पळवितात. माल उतरवून घेऊन चोरलेला ट्रक कुठे तरी सोडून देतात. टायरने भरलेला ट्रक बेळगाव येथे टायर उतरवून कोल्हापूरजवळ सोडून देण्यात आला होता. बिस्किटांचा ट्रकही चिकोडी तालुक्मयात सोडून देण्यात आला होता.
मालाची विक्री होण्याआधीच टोळी पोलिसांच्या जाळय़ात
महामार्गावर प्रत्येक शहरात त्यांच्याशी संबंधित कोणी ना कोणीतरी असतोच. अश्विन जैनचा यापूर्वी पानमसाल्याचा व्यवसाय होता. बेळगाव येथील आपल्या मित्राला संपर्क साधून त्याने आपण टायरचा बिझनेस सुरू केला आहे. थोडय़ा दिवसांसाठी कुठेतरी गोडावूनची व्यवस्था करा, असे सांगत गोडावूनही मिळविले होते. माल उतरविल्यानंतर परस्पर त्याची विक्री केली जाते. पण मालाची विक्री होण्याआधीच आंतरराज्य गुन्हेगारांची ही टोळी पोलिसांच्या जाळय़ात अडकली.
देशभरात अनेक गुन्हे…
चिकोडी पोलिसांनी अटक केलेल्या त्रिकुटाने आणखी कुठे गुन्हे केले आहेत का? याचा तपास सुरू आहे. एका चिकोडी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात त्यांनी दोन गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. राजस्थान, बेंगळूर, उत्तरप्रदेश व पश्चिम बंगालमध्येही मालवाहू ट्रक किंवा कंटेनर चोरण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्येही या त्रिकुटाचा सहभाग आहे का? याचीही चौकशी करण्यात येत आहे. त्यांनी चोरलेले टायर चेन्नईमधून येत होते तर बिस्किटे पंजाबमधून पुण्याला नेण्यात येत होती. लोडिंगच्या ठिकाणीच त्यांनी चालकावर मोहिनी घातल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.