मंत्री गावडे यांची आपत्तकालीन व्यवस्थापन समितीसंबंधी बैठक : कामचुकार तलाटय़ावर कारवाई करा,मान्सुनची वाट बघत अभियंत्याचा सुस्त कारभार
प्रतिनिधी / फोंडा
राज्यातील महत्वाची खाते सांभाळणारे सार्वजनिक बांधकाम, जलस्रोत, वन, वीज खातेप्रमुखांना जून महिना लागल्यानंतर आपत्तकालीन व्यवस्थापन समितीची जाग का येते? या सर्व खातेप्रमुखांनी आपत्तकालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामपातळीवर सर्वेक्षण करून अहवाल सादर करणे अंत्यत आवश्यक आहे. खात्यातील अभियंत्यांनी जबाबदारीने काम करताना इतर संबंधित खात्याशी समन्वयक साधणेही तेवढेच आवश्यक असल्याचे मत कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी मांडले.
फोंडा तालुक्यातील चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा व आपत्तकालीन व्यवस्थापन समितीच्या निवडीसाठी महत्वाची बैठक काल शुक्रवारी कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिर येथे घेतलेल्या बैठकीत फोंडा तालुक्यातील पंचसदस्य व विविध खात्याचे सरकारी अधिकारी सहभागी होते. यावेळी मान्सुनपुर्व कामे व चक्रीवादळानंतरच्या परिस्थितीवर महत्वाची चर्चा करण्यात आली. यावेळी फोंडय़ाचे आमदार रवी नाईक, नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर, सरकारी अधिकारी गौरीश कुट्टीकर, उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक उपस्थित होते.
आपत्तकालीन परिस्थिती हाताळण्यासंबंधी सर्व खातेप्रमुखांचा सुस्त कारभार दिसून येतो. वेळीच उपाययोजना करून परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न का करीत नाही असा सवाल मंत्री गोविद गावडे यांनी यावेळी उपस्थित केला. त्यासाठी महत्वाच्या जलस्रोत खाते, वीज, सार्वजनिक बांधकाम खात्याचे पाणी विभाग व राष्ट्रीय महामार्ग, आणि वनखात्याने संघटीतपणे अग्निशामक दलाच्या समन्वयाने उदभवणाऱया परिस्थितीव मात करणे गरजेचे आहे.
कामचुकार तलाटय़ांवर त्वरीत कारवाई करा- मंत्री गावडे
चक्रीवादळामुळे फोंडा तालुक्यातील अनेक गावात दोन-तीन दिवस वीज गायब झाली होती. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी वीज खात्याने मोबाईल ट्रान्सफॉमर्स उपलब्ध करावे. वीजेमुळे पाणीपुरवठा खंडीत होऊ नये यासाठी पाणी प्रकल्पाच्या पंपहाऊसला जनरेटर्सशी सोय आपत्तकालीन व्यवस्थापनाअंतर्गत तरतूद व्हावी. ओपा जलशुद्धिकरण व म्हैसाळ धरणावर जनरेटर्स उपलब्ध करावे. आपत्तकालीन परिस्थितीत एखाद्या घरावर झाड कोसळल्यास नुकसानीचा आकडा नोंदणी व त्यांच्या मंजूरीसाठी तलाटीची भूमिका महत्वाची असते. मात्र प्रत्येक घटनेत लोकप्रतिनिधी घटनास्थळावर उपस्थित असतो तलाटी गायब असतो, त्यानंतर पंचानाम्याच्या अहवलाही भेटण्यासाठी कुटूंबियांना वाट बघत रहावे लागत आहे. काही ठिकाणी तलाटी रजेवर असल्याचे कारण देण्यात येते आपत्तकालीन स्थितीत अशी कारणे खपवून घेतली जाणार नसून अशा तलाटयावर त्वरीत कारवाई व्हावी अशी मागणी मंत्री गावडे यांनी केली.
धोकादायक झाडे हटविण्यासाठी प्राधान्यता द्यावी
भाटकार व मुंडकार हा प्रश्न माणूसकीच्या दृष्टीकोनातून विसरा. घराला धोकादायक ठरणारी झाडे हटविण्यासाठी तारीख पे तारीख मार्ग निवडू नका. गरिब कुटूंब उध्वस्त होण्यापुर्वी तात्काळ अशी प्रकरणे निकालात काढा. वेळप्रसंगी धोकादायक झाडे हटविण्यासाठी सरकारचा निधी वापरा असे आदेश दिला. आपत्तकालीन परिस्थिती हाताळयासाठी मामलेदार कार्यालयाला रू. 25 हजाराचा तर उपजिल्हाधिकाऱयांसाठी रू 50 हजाराचा निधी मंजूर करण्याची तरतूद आहे. फोंडा तालुक्यात 20 पंचायतीचा समावेश आहे. ही रक्कम कोणाला पुरणार असा प्रश्नही काही सरपंचांनी चर्चेत उपस्थित केला. अडथळा ठरणारी रस्त्यावरील सर्व झाडे हटविण्यासाठी उपजिल्हाधिकाऱयाचा अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात यावी असा आदेश मंत्री गोविंद गावडे यांनी दिला. रू. 5 ते 10 लाखांच्या मालमत्तेची हाती झाल्यानंतर सरकाराकडून मिळणारी रू. 10 हजार आर्थिक मदतीसारखी परिस्थिती ओढवू नये यासाठी घरांना धोकादायक ठरणारी झाडे हटविण्यासाठी उपजिल्हाधिकाऱयांनी नियम शिथील करावे.
वनखात्याने नेहमी नियमावर बोट ठेवू नये- आमदार रवी नाईक
आमदार रवी नाईक यांनी मागील वर्षीच्या आपत्तकालीन समितीच्या अहवालानंतर देण्यात आलेले फोंडा तालुक्यातील काही ‘चेक बाऊन्स’ झाल्याची निदर्शनास आणून दिले. फंडात पैसेच नाही की तांत्रिक अडचण याची शहनिशा केल्यानंतर त्वरीत लाभार्थीना धनादेशाचे वाटप करण्यात यावे असे आमदार रवी नाईक यांनी सुचित केले. रस्त्यावर कोसळलेल्या झाडांचे लाकडे एखाद्या स्मशानभूमीत दान करीत असल्यास वनखात्याने त्या सरपंचावर कारवाई करू नये असे आवाहन रवी नाईक यांनी केले. सर्व पंचायतीना झाडे कापण्याची मशिन पुरविण्यासंबंधी विचार व्हावा अशी सुचना फोंडा अग्निशामक दलाचे सुशिल मोरजकर यांनी केली. सरपंच राजेश कवळेकर, दिलेश गावकर, दिलीप नाईक, राजेश नाईक यांनी चर्चेत सहभाग घेऊन महत्वाच्या सुचना केल्या.