प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोना रुग्णांची संख्या राज्यात आटोक्यात येत असताना रत्नागिरी जिल्हय़ातही ती आटोक्यात आणण्याचे मोठे आव्हान उभे आहे. जिह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 66 टक्क्यांवरून 86.98 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. ही समाधानाची बाब असली तरी मृत्यूदर 3.32 टक्के ही गंभीर बाब आहे. यासाठी जिल्हय़ात आणखी 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याबाबत प्रशासनासोबत प्राथमिक चर्चा झाली आहे. पालकमंत्री, मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्य़ातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकाऱयांसोबत शुक्रवारी बैठक घेतली. त्यावेळी जि. प. प्रशासन, पदाधिकारी, जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन विभागातील अधिकाऱयांची उपस्थिती होती. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी या बाबत माहिती दिली. लॉकडाऊनबाबत सर्व विभागांच्या अधिकाऱयांशी प्राथमिक चर्चा झाली आहे. त्यासाठी सर्व संस्था, व्यापारी संघटना व जनतेला विश्वासात घेतले जाणार आहे. त्यासाठी काही अवधी देण्यात येणार आहे. या निर्णयासाठी जिल्हावासियांनी सहकार्य करण्याचे आवाहन सामंत यांनी केले आहे.
जिल्हय़ासाठी खनिकर्म निधीतून 9 तर राज्य शासनाकडून 7 रुग्णवाहिका नव्याने प्राप्त झाल्या आहेत. जिल्ह्य़ात 2 लाख 55 हजार 640 नागरिकांचे म्हणजे 16 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्हय़ाला प्राप्त होणारे लसीचे डोस 24 तासांत लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय झाला आहे. शुक्रवार 28 मे रोजी नव्याने साडेतेरा हजार डोस उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्य़ाबाहेरून आलेल्यांनीही रत्नागिरीत लसीकरण करण्याबाबत आरोग्य यंत्रणेलाही सूचना देण्यात आल्या आहेत.
पत्रकार परिषदेला सामंत यांच्यासोबत जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव, सीईओ डॉ. इंदुराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने, समाजकल्याण सभापती परशुराम कदम, आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, माजी सभापती महेश म्हाप उपस्थित होते. यावेळी नव्याने दाखल झालेल्या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा मंत्री सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला.