‘जी आर्ततेने केली जाते ती आरती आणि जे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध!’ अशी आरतीची व्याख्या मी वाचली आणि ऐकलीही होती. आरती ही ओवाळली जाते. याचा अर्थ असा की तिला चक्राकार लय असावी. ती आळवलीही जाते. एकेक चरण पुनः पुन्हा घोळून म्हटलेही जातात. याचाच अर्थ आवर्तन हाही तिचा सहजभाव असावा. आरत्या म्हणताना साथीला केवळ तबला पेटीच नव्हे तर झांजा (टाळाएवढय़ा भक्कम नव्हेत हं! घनवाद्यांतला हा प्रकार अंमळ नाजूक आहे.) शंख, घंटा, तास इत्यादी वाद्यांसकट अगदी साग्रसंगीत अशी केली जाते. तिचा आवाज दरीभर गर्जून तो भाग अगदी दुमदुमून जातो. तशीच ती रोजच्या देवपूजेत फक्त छोटय़ाशा देवघंटिकेच्या साथीनेही केली जाते. जी फक्त देवांनाच ऐकू येत असावी! नुसत्या टाळय़ा वाजवूनही आरती म्हटली जाते. आरती ही उभे राहूनच करण्याची पद्धत आहे तरीही महालक्ष्मीची पूजा, मंगळागौरीची पूजा अशावेळी फक्त महिला आरती करतात तेव्हा ती मुख्यतः बसूनच केली जाते. मध्यभागी असलेल्या तबक किंवा ताह्मनात प्रज्वलित निरांजने आणि कर्पुरारती अक्षतांवर स्थापित केलेली असते. आणि ते तबक किंवा ताह्मन सर्वजणी उजव्या हाताने उचलून धरतात आणि अगदी हलकेच ते हलवीत त्या लयीवर गोड आवाजात कितीतरी सुंदर सुंदर आरत्या म्हटल्या जातात. हे आरतीचे कौतुक भारतात सर्वत्र आहे. वाराणसीत गंगाकिनारी मोठय़ा थाटामाटात आणि धुमधडाक्मयात केली जाणारी गंगामैयाची आरती प्रसिद्ध आहे. तशीच नर्मदा नदीच्या किनाऱयावर केली जाणारी नर्मदा मातेची आरतीही तशीच प्रसिद्ध आहे. दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये केली जाणारी आरतीही अशीच दणदणीत असते. घनवाद्यांचा सढळ हस्ताने वापर हे त्यांचे वैशिष्टय़! भली मोठी घंटा, दांडगा टोल, शंख वगैरे भक्कम मंडळी आपला जीव ओतून वाजवत असतात. हे सगळे काही आपण पहात असतो. ऐकत असतो आणि करतही असतो. फक्त आपण सारेजण एकच गंमत विसरलेले असतो. ती म्हणजे आरती हा गायन प्रकार आहे. आरती ही गानरूपच असते. संगीत म्हटल्यानंतर त्यात शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत असे जे प्रकार येतात त्यापैकी आरती हा बऱयाच अंशी अभिजात संगीतावर आधारित असलेला सुगम गायन प्रकार आहे.
हे म्हटल्यावर आपल्या लक्षात येईल की आपण अगदीच गाणे म्हणत नाही असे काही नाही. तुम्ही गाण्याकडे कितीही दुर्लक्ष केले तरी जाल तिथे गाणे अविरतपणे तुमच्या मनावर सावली धरून येते ते असे. आरती हा गायन प्रकार तसा जुनाच असावा असे वाटते. कारण कितीतरी जुन्या आरत्या या संतकवींनी लिहिलेल्या आढळतात. कुणी लिहिल्या ते ओळखणे खूप सोपे. आरतीची शेवटची ओळ पहावी. अभंगाप्रमाणेच तिथे नाममुद्रिका आढळेल. उदाहरणार्थ आपली गणपतीची सुखकर्ता दु:खहर्ताच घेऊ. त्या आरतीमध्ये शेवटच्या कडव्यात ‘दास रामाचा वाट पाहे सदना’ अशी ओळ आहे. त्यातला ‘दास रामाचा’ म्हणजेच समर्थ रामदास स्वामी. तसेच ‘विष्णुदास नामा’ यांनी लिहिलेल्या आरत्या. त्यांनी रचलेली रामाची आरती तर सर्वांगसुंदर आहे. रामाची अलंकारमंडित मूर्ती आणि रामरायाचा सगळा परिवार अगदी डोळय़ासमोर उभा राहतो. त्रिभुवनमंडित माळ गळा, आरती ओवाळू पाहू ब्रह्मपुतळा, श्रीराम जय राम जय जय राम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
धृवपदाच्या या चार ओळी आरतीतला आर्तभाव दाखवायला पुरेशा आहेत. रामरायाला ब्रह्मपुतळा म्हणून मारलेली हाक किती म्हणून गोड असावी! तसेच मेघश्याम या सुरेख वर्णननामाचे वैशिष्टय़! पावसाच्या ढगांचा श्यामवर्ण असलेला रामराया दिसलाच पाहिजे! हा झाला शब्दांचा सोहळा. आता वळू चालींकडे. आपला हिंदू समाज हा अतोनात गानप्रिय आहे. शिवाय त्याच्याकडे अभिजात संगीताचा कान आहे य्ााचा मजबूत पुरावा म्हणजे या आरत्यांना लावलेल्या नितांतसुंदर चाली. ‘त्रिभुवनमंडित’ ची ती गोड चाल जेव्हा आरतीत ऐकायला मिळते तेव्हा आनंदाने डोळे बरसू लागतात. घशात आवंढा दाटून येतो. भावजागृती यालाच म्हणत असावेत का ते माहीत नाही. ती आरती ऐकल्यावर आणखी एका गोष्टीसाठी वाईट वाटते ते अशासाठी की ती सांगतेची आरती आहे. गणपतीच्या दिवसात जेव्हा घरोघरी आरती मंत्रपुष्प होतात तेव्हा आरत्यांच्या त्या जंगी कार्यक्रमामध्ये काही विशिष्ट आरत्याच समाप्ती करताना म्हटल्या जातात. त्यातलीच ही एक. आज अनेक भक्तगण आरती एक्स्पर्ट आहेत. त्यांनी केलेला आरतीमंत्रपुष्प अत्यंत श्रवणीय असतो. या आरत्यांचे अजून एक वैशिष्टय़ म्हणजे त्यातल्या बहुतेक आरत्या चक्क रागांवर आधारित आहेत. काही काही आरत्या तर पूर्णपणे रागांमध्येच बांधल्या आहेत.
जय जय त्र्यंबकराज, गिरिजानाथा गंगाधरा हो
ही त्र्यंबकेश्वर महादेवाची आरती हे त्यातले एक उदाहरण. ती आरती रीतसर भैरव रागावर आधारित आहे.
ऐकावी कथा हरि हो ऐकावी कथा, माझ्या राघवाची माझ्या माधवाची ही आरती अशीच भैरव रागामध्ये बांधलेली आहे. तर
मंगलदायक सिद्धीविनायक : ही गणपतीची आरती भीमपलासीवर आधारित आहे.
विघ्नांतक विघ्नेशा हे गजानना
किंवा
राजगजानन गावा हो या आरत्या केदार रागावर आधारित आहेत. तशाच काही आरत्या भैरवीत सुद्धा आहेत. पैसाफंड गणेशमेळय़ासाठी त्यांच्या कवीने रचलेली आरती हेरंब शिवकुलदीपका ,तुज आरती गणनायका ही आरती रीतसर भैरवीमध्येच आहे. तोडू म्हटले तरी तुटत नसलेली ही अभिजात संगीताची नाळ! कृष्णाच्या, विष्णूच्या आरत्या तर परमसुंदर म्हणाव्या अशा आहेत. ‘आरती भुवनसुंदराची’ किंवा ‘आरती करू संध्याकाळी ओवाळितो वनमाळी’ फार सुंदर आहेत. ‘आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म’ हा आरत्यांमधला ‘बडा ख्याल’ असे पुलं त्यांच्या ‘हरितात्या’ मध्ये म्हणून गेले खरे पण गावात होणाऱया आरत्यांमध्ये अख्खा चतुरंग आहे. ‘आवडी गंगाजळी देवा न्हाणिले’ पासून सुरू होणारा चतुरंग श्रीपांडुरंगाच्या आरतीपर्यंत येऊन थांबतो. त्याही आरत्या अनुक्रमे पिलु, काफी, मल्हार आणि थेट दुर्गा, खमाज या रागांशी लडिवाळे करतात. तो चतुरंग आपण लहानपणापासून असंख्य वेळा ऐकत आलेलो आहोत. आता त्या चाली लावणाऱया संगीतज्ञांविषयी अतिशय पूज्यभाव वाटतो. आम्हा लोकांना अभिजात संगीताची गोडी लावण्यात या आरत्यांचा सहभाग मोठा आहे यात शंकाच नाही. कारण आपण जे काही ऐकतो आणि जे पुनः पुन्हा ऐकावेसे वाटते तो रागसंगीताच्या समृद्ध परंपरेचा एक भाग आहे, हे अजिबात माहीत नसताना कानावर झालेले हे स्वरसंस्कार आहेत.
अपर्णा परांजपे-प्रभु