उच्चपदावर कार्यरत अधिकाऱयांच्या पत्नींची रोजचीच सत्वपरीक्षा
प्रतिनिधी /बेळगाव
सावित्रीने यमाकडून सत्यवानाचे प्राण परत मिळविले आणि वटसावित्रीचे व्रत सुरू झाले. या सावित्रीच्या किंवा ज्योतिबाच्या-सावित्रीच्या लेकी नेहमीच कुटुंब आणि समाज अशी दुहेरी कसरत यशस्वीपणे करत आल्या आहेत. कोरोनाने या लेकींची सत्वपरीक्षा घेतली खरी, परंतु त्यांच्यातील लढाऊ बाण्यावर कोरोनाला मात करता आली नाही.
कोरोनाने कुटुंबातील कर्त्याला लक्ष्य केले. त्यामुळे एकटय़ा सावित्रीची आता लढाई सुरू झाली आहे. याच काळात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनास्थिती हाताळणाऱया प्रशासकीय अधिकाऱयांना कुटुंबासाठी फार कमी वेळ देता आला. परंतु, त्याबद्दल कसलीच तक्रार न करता त्यांच्या पत्नींनी कुटुंबाची आघाडी समर्थपणे पेलली. अडचणी त्यांनाही आल्या, परंतु पतीपर्यंत त्या पोहोचणार नाहीत आणि त्यांचा ताण वाढणार नाही, याची दक्षता प्रत्येकीनेच घेतली. वटपौर्णिमेनिमित्त यंदा या सावित्रींशी संवाद साधला तेव्हा, “ते जनतेचे सेवक आहेत. त्यामुळे जनतेकडे लक्ष देणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे’’, अशीच भावना सर्व जणींनी व्यक्त केली.
अनेक जन्म ते मला लाभले तर मी भाग्यशालीच ठरेन
मैत्रेयी या मूळच्या कोलकात्याच्या. वडील सरकारी अधिकारी. कोलकात्याला बिस्वास यांच्या आजी मैत्रेयी यांच्या शेजारी राहत होत्या. त्यातून ओळख होऊन हा ठरवून (ऍरेंज) केलेला प्रेमविवाह आहे. अम्लान यांची शिक्षणासाठी अनेक शहरांमध्ये भ्रमंती झाली. मैत्रेयी यांनी फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले असून दूरस्थ पद्धतीने त्यांनी एमएची पदवी घेतली आहे.
कोलकाता येथेच 2000 साली त्यांचा विवाह झाला. सासरे मुंबईत आयकर विभागाचे आयुक्त असताना अम्लान यांची तेथे बदली झाली. तेव्हा मैत्रेयी त्यांच्यासोबत गेल्या. पण म्हैसूर येथे प्रशिक्षण सुरू झाल्यावर त्या काही दिवसांसाठी माहेरी आल्या. अम्लान यांचे पोस्टींग बळ्ळारी येथे झाले. बेळगावला येण्यापूर्वी त्या मुलांच्या शिक्षणासाठी बेंगळूरलाच होत्या. परंतु, कोविडमुळे ऑनलाईन वर्ग सुरू झाले आणि मैत्रेयी यांना बेळगावला पतीसमवेत राहता आले. त्यामुळे एकप्रकारे कोरोनाचे माझ्यावर हे उपकारच आहेत, असे त्या मिश्कीलपणे सांगतात.
उच्चपदस्थ अधिकाऱयाच्या पत्नीला दुहेरी पालकत्व स्वीकारावे लागते. कुटुंब आणि मुलांसाठी पती वेळ देईलच याची खात्री नसते. मात्र, त्याचा स्वीकार आपण मनापासून करायला हवा. अम्लान हे ‘वर्कोहोलिक’ आहेत. ते जेवढे कामात असतात, तेवढे आम्हाला आणि त्यांना बरे असते, असेही त्या जाता जाता नमूद करतात. आपण साध्या खुर्च्यांवर बसतो. पण ते ज्या खुर्चीवर बसतात, त्या खुर्चीला काटेही आहेत. एक सही करण्यासाठी दहावेळा विचार करावा लागतो, तेव्हा त्यांच्यावर असलेल्या कामाच्या ताणाची आपण कल्पना करू शकतो. सर्वच अधिकाऱयांचा जनसेवा हा धर्म आहे. त्यामुळे अधिकाऱयांच्या पत्नीने फार अपेक्षा ठेवूच नयेत, असे त्या ठासून सांगतात.
कोरोनाने आम्हालाही ग्रासले. माझी दोन मुले इशान आणि विहान यांच्यापैकी एका मुलाला कोरोना झाला. या सर्व काळात पतीला काम करणे भाग होते. त्यांचे काम घरीही सुरूच होते. बिम्समधला कारभार सुधारण्यासाठी प्रशासक म्हणून त्यांची नेमणूक सरकारने करणे, ही त्यांच्या निःस्पृह सेवेची पावती आहे. ते ज्या ठिकाणी आहेत तेथे ते उत्तम सेवा बजावतील. अनेक आव्हाने त्यांच्यासमोर आली. तथापि, ज्या पद्धतीने त्यांनी या आव्हानांचा सामना केला, ते पाहता मला त्यांचा अभिमान वाटतो.
अधिकाऱयांच्या पत्नींना समाजासाठी खूप काम करणे शक्मय आहे. मी स्वतः वैयक्तिक पातळीवर किल्ला तलावाजवळील स्थलांतरितांना मदत केली आहे. मैत्री क्लबतर्फे किट वितरण, नेत्र तपासणी, चष्मे वितरण आणि कांबळी खुटवर महिलांसाठी स्वच्छतागृह उभारले आहे. नव्या नवलाईमध्ये माझ्याही खूप अपेक्षा होत्या. परंतु, वयपरत्वे आपल्याला एक परिपक्वता येते आणि आपला पती हा प्रथम जनतेचा प्रतिनिधी आहे, याची खूणगाठ आता मी बांधली आहे. अशा पतीचा मला अभिमान असल्याने अनेक जन्म ते मला लाभले तर मी भाग्यशालीच ठरेन, असा विश्वास मैत्रेयी व्यक्त करतात.
-मैत्रेयी बिस्वास (प्रादेशिक आयुक्तांच्या पत्नी)
पती-पत्नीचे नाते विश्वासावरच मजबूत होते
तरुजा या मूळच्या हावेरीच्या. अत्यंत साध्या आणि आपण बरे, आपले काम बरे हे सूत्र अंमलात आणणाऱया. आपल्या जीवनातील पहिली मुलाखत त्यांनी ‘तरुण भारत’ला दिली. तेसुद्धा अनेक आढेवेढे घेऊन. त्या बीए पदवीधर आहेत. एम. जी. हिरेमठ हे हिरेबागेवाडीचे. बेळगावमध्येच त्यांचे शिक्षण झाले. केएलई कॉलेजमध्ये ते प्राध्यापक म्हणून काम करत होते. हावेरीतील एका कॉलेजमध्ये फिजिक्सचे प्राध्यापक म्हणून काम करताना त्याच कॉलेजमध्ये शिकणाऱया तरुजा यांच्याशी त्यांचा परिचय झाला आणि हासुद्धा ठरवून केलेला प्रेमविवाह होता.
एम. जी. हिरेमठ यांनी यापूर्वी हुबळी, बिदर, बळ्ळारी, मंगळूर, बेंगळूर, बागलकोट, गदग येथे सेवा बजावली आहे. मुलांच्या शिक्षणासाठी बारा वर्षे ते बेंगळूरला होते. आजही दोन्ही मुले बेंगळूरमध्येच शिक्षण घेत आहेत. तरुजा पतीसमवेत बेळगावला आल्या आहेत.
कोरोनाचा आपला अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, माझी मुलगी नेहा बेंगळूर येथे बालरोग शास्त्रामध्ये एमडी करते आहे. मुलगा निश्चल तोही बेंगळूरमध्ये आहे. मुलगी पहिल्या आणि दुसऱया दोन्ही लाटेमध्ये कोरोनाबाधित होती. पहिल्या लाटेवेळी मी तिच्या सोबत होते, पण दुसऱया लाटेवेळी मला जाता आले नाही. बेळगावमध्ये यांच्यावर कामाचा ताण अधिक होता. मग फोनवरून फक्त मुलांशी संपर्क होत असे. अशावेळी माझे मन दोन्हींकडे ओढ घेत होते. तो काळ माझ्यासाठी कठीण गेला.
दुसरे म्हणजे ग्रामीण भागातील रुग्ण क्वारंटाईन होण्यास तयार नसत. त्यांची समजूत घालण्यासाठी हे सतत दौरा करत. त्यामुळे मला खूप काळजी वाटायची. ते घरात खूप कमी वेळ देऊ शकले. परंतु, माझी तक्रार नव्हती. आम्ही सर्व एकत्र बाहेर जाऊन दोन वर्षे उलटून गेली. पण कोरोनाने सर्वांवरच ही वेळ आणली आहे. फावल्या वेळेत मी बागकाम करते. गाण्याची आणि नृत्याची मला आवड आहे, त्यात मन रमवते.
पतीबद्दल सांगायचे म्हणजे कोणतीही अवघड स्थिती ते खूप संयमाने हाताळतात. त्यांच्याकडे समजून घेण्याची उत्तम कला आहे. त्याचे अनुकरण आम्ही करायला हवे. त्यांच्याशी पटत नाही अशी कोणतीही गोष्ट नाही. पण ते वेळेच्या बाबतीत इतके काटेकोर आहेत, की कधी कधी माझी दमछाक होते. अर्थात त्याबद्दल माझी तक्रार नाही. त्यांना काम करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य देणे, हे माझे कर्तव्य आहे आणि पती-पत्नीचे नाते विश्वासावरच मजबूत होते, असे तरुजा सांगतात.
-तरुजा हिरेमठ (जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या पत्नी)
पती-पत्नीच्या नात्यामध्ये समजूत महत्त्वाची…
संगीता मूळच्या चेन्नईच्या. माहिती-तंत्रज्ञान या विषयाच्या त्या एमएस्सी पदवीधर आहेत. त्यांचे पती मूळचे हुमनाबादचे. त्यांचा रितसर स्थळ सुचवून झालेला विवाह आहे. त्यागराजन यांनी कोलार, बिदर, कोप्पळ येथे जिल्हा पोलीसप्रमुख म्हणून सेवा बजावली. त्यानंतर बेंगळूरमध्ये सीआयडी, लोकायुक्त, आर्थिक गुन्हेगारी प्रतिबंध अशा खात्यांमध्ये सेवा बजावली. एक वर्षापूर्वी प्रिया आणि प्रितम या दोन लहान मुलांसह ते बेळगावला आले.
संगीता म्हणतात, “मुले लहान असल्याने कोरोनाचे संकट सुरू होताच मी घरकामाला येणाऱया सर्वांना काही दिवस थांबण्यास सांगितले. पती घरी आल्यानंतरसुद्धा त्यांना मुलांना सहज भेटू दिले नाही. भावना मी समजून घेऊ शकते, पण मला कर्तव्यकठोर होणे भाग होते. मुलांना घेऊन ये, असा माहेरहून अनेकदा निरोप आला. पण यांच्यावरील मानसिक ताण लक्षात घेऊन मी त्यांना सोडून जाऊ शकले नाही.’’
“त्यागराजन यांचे आई-वडील कांचीपूरमला राहतात. त्यांनाही कोरोना झाला. परंतु, आम्ही जाऊ शकलो नाही. कित्येक दिवस सुटीसुद्धा त्यांनी घेतलेली नाही. कारण ही वेळ तशी नाहीच. मी ‘पार्टीपर्सन’ नाही. मला घरी रमायला आवडते. पती-पत्नीच्या नात्यामध्ये समजूत फार महत्त्वाची आहे. घरातील सर्व जबाबदाऱया अगदी घरकामासह मी स्वतःकडे घेऊन त्यांना जनसेवेसाठी मुक्त वेळ दिला आहे. ते आमचे कर्तव्यच आहे,’’ असे संगीता मानतात.
–संगीता त्यागराजन (पोलीस उपायुक्त त्यागराजन यांच्या पत्नी)
सात जन्म त्यांच्यासोबत सप्तपदी चालण्यास माझी तयारी
रंजिता पीएचडी करत असून त्या कामासाठी तुमकूरला गेल्याने फोनवरून त्यांनी उत्साहाने संवाद साधला. त्या तुमकूरच्या. तेथेच त्यांनी एमए व एलएलबीचे शिक्षण घेतले. धारवाड विद्यापीठातून त्यांनी एलएलएम पदवी घेतली. सध्या तुमकूर विद्यापीठामध्ये त्या ‘कौटुंबिक हिंसाचार’ या विषयावर पीएचडी करत आहेत.
लक्ष्मण यांच्याशी कसा परिचय झाला? हे सांगताना ते एका व्याख्यानासाठी तुमकूरला आले होते. त्यावेळी भेट झाली आणि भेटीचे रुपांतर प्रेमात होऊन 2017 मध्ये हुबळी येथे लग्न झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभीच्या काळात लक्ष्मण यांनी उडुपी, बळ्ळारी येथे सेवा बजावली. उडुपीतील वास्तव्य खूप आव्हानात्मक होते. कारण तेथे समाजाला कायद्याची जाण आहे. याच ठिकाणी मणिपाल विद्यापीठ व वैकुंठ बालिगा लॉ कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. आता त्या पतीसमवेत बेळगावला आल्या आहेत.
पतीचे काम पाहता त्यांना कुटुंबासाठी वेळ देणे इच्छा असूनही जमत नाही. मात्र, माझ्या पहिल्या अपत्यप्राप्तीवेळी ते दोन दिवस तुमकूरला आले, पण पुन्हा सेवेत रुजू झाले. मलाही प्रशासकीय सेवेत जायचे आहे. तसे प्रयत्नही सुरू आहेत. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी आणि कामाचे स्वरूप याची मला माहिती होती. त्यामुळे माझ्या फारशा काही अपेक्षाही नव्हत्या, असे त्या म्हणतात.
मात्र, कोविड हे अनपेक्षित संकट होते आणि ती परिस्थिती माझ्या पतीने खूप उत्तमरीत्या हाताळली आहे, असे त्या म्हणतात. परंतु, ते जनसेवेसाठीच आहेत, याची मला खात्री आहे. प्रत्येकालाच आयपीएस होता येत नाही. त्यामुळे मला त्यांचा अभिमान आहे. त्यांना सण, समारंभ साजरे करायला आवडतात, परंतु दोन वर्षे हे सर्व त्यांनी घरापुरतेच मर्यादित ठेवले.
त्यांच्याकडे अत्युच्च पातळीची कौन्सिलिंगची क्षमता आहे. फक्त त्यांनी थोडा राग कमी करावा, असे मला वाटते. अर्थात पूर्वीपेक्षा तो बराच कमी झाला आहे. मोठा विक्रमादित्य दोन वर्षांचा तर दुसरे बाळ चार महिन्यांचे आहे. हे त्यांना खूप ‘मिस’ करतात. काळजीमुळे जवळ घेऊ शकत नाहीत. मात्र, त्यांचे काम, स्वभाव आणि क्षमता पाहून सात जन्म त्यांच्यासोबत सप्तपदी चालण्यास माझी तयारी आहे, असे रंजिता सांगतात.
-रंजिता निंबरगी (जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या पत्नी)
अन् अश्रूंचा बांध फुटला…
कोरोना काळात महाराष्ट्रातील एका कुटुंबातील महिला मृत झाल्यानंतर सीमाबंदीमुळे कुटुंबीयांना मंडय़ामधील आपल्या मूळगावी पोहोचता आले नाही. तेव्हा लक्ष्मण निंबरगी यांनी निपाणी येथे त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. परंतु, घरी आल्यानंतर प्रथमच त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि ही वेळ कोणावरही यायला नको, अशी आळवणी त्यांनी ईश्वराकडे केली, अशी आठवण रंजिता यांनी सांगितली.
संकट टळो आणि जीवन पूर्ववत जगता येवो एवढीच अपेक्षा
तेजस्विनी मूळच्या सौंदत्तीच्या. तेथे त्यांचे पदवीपूर्व व नंतर धारवाड येथे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. स्थळ सुचवून 2011 मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यावेळी विक्रम आमटे हे पशुवैद्यकीय तज्ञ म्हणून काम करीत होते. लग्नानंतर त्यांनी परीक्षा दिल्या आणि प्रोबेशन अधिकारी म्हणून बळ्ळारी येथे ते रुजू झाले. पुढे चामराजनगरला बदली झाली. त्यावेळी आम्ही म्हैसूरमध्ये राहत होतो. मंगळूर येथे एक वर्ष राहून आम्ही बेळगावला आलो.
लग्नावेळी हे प्रशासकीय सेवेत जाणार आहेत, याची कल्पना नव्हती. परंतु, त्यांची बुद्धिमत्ता पाहून आम्ही सर्व कुटुंबीयांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. कोरोना काळात हे बाहेर जातात, तेव्हा खूप काळजी वाटते. ते घरी आल्यावर पूर्ण सॅनिटाईज करून एका वेगळय़ा खोलीत त्यांचे वास्तव्य आहे. कोरोनाने कळस गाठला तेव्हा हॉटेलमध्येच त्यांचे वास्तव्य होते. ते दहा दिवस काढणे मला कठीण झाले. परंतु, कसेबसे निभावले. त्यांचा मला आवडणारा गुण म्हणजे ते खूप उत्तम काळजी घेतात. त्यांच्याजवळ खूप संयम आहे. प्रारंभी फार तीव्र असणारी रागाची पातळी आता कमी झाली आहे. मात्र, आता मुले खूप कंटाळली आहेत. घरातल्या घरातच व्हिडिओ कॉलद्वारे वडिलांशी बोलणे त्यांना आवडत नाही. त्यामुळे हे संकट टळो आणि आम्हाला आमचे कौटुंबिक जीवन पूर्ववत जगता येवो, एवढीच माझी अपेक्षा!
-तेजस्विनी आमटे (पोलीस उपायुक्त विक्रम आमटे यांच्या पत्नी)