ऑनलाईन टीम / मुंबई :
प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याच्या मागणीसाठी दिबांच्या स्मृतीदिनी, आज, गुरुवारी सिडको भवनाला घेराव घालण्याचा निर्धार भूमिपुत्रांनी केला आहे. जमावबंदी लागू असतानाही तसेच पुकारलेले आंदोलन होवू नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करूनही भूमिपुत्रांचा एल्गार कायम असल्यामुळे या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात सर्वात मुख्य म्हणजे नवी मुंबईतील महत्त्वाचे रस्ते आणि वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. नवी मुंबईत अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसंच वाहतुकीतही मोठे बदल करण्यात आलेले आहेत. यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या मार्गात बदल होणार आहेत.
दरम्यान, नवी मुंबई विमानतळाच्या कामाला सुरुवात होण्यापूर्वीपासून म्हणजेच मागील दहा वर्षांपासून स्थानिक प्रकल्पग्रस्त नागरिक, नेते विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी आग्रही आहेत. अनेक संस्था, संघटनांनी आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबतच्या मागण्यांची निवेदने सिडको, राज्य सरकारकडे दिलेले आहेत.
काही महिन्यांपूर्वी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी पुढे आणली. सिडको संचालक मंडळाने बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव सरकारकडे पाठवल्यानंतर या नामांतराच्या वादाला तोंड फुटले. सुरुवातीपासून सर्वपक्षीय नेत्यांची कृती समिती दिबांच्या नावाचा आग्रह धरत असताना राज्य सरकारमधील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बाळासाहेबांच्या नावाला पाठिंबा दिल्यानंतर ‘दिबा विरुद्ध बाळासाहेब’ असा वाद निर्माण झाला.