सुभाष शिरोडकर यांची माहिती
प्रतिनिधी /मडगाव
‘आयआयटी’ अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेला गोव्याच्या विविध भागात विरोध होत आहे. हा विरोध अज्ञानातून होत आहे. जर आयआयटी आपल्या शिरोडा मतदारसंघात येत असल्यास आपण पायघडय़ा घालून त्यांचे स्वागत केले असते अशी माहिती शिरोडय़ाचे आमदार सुभाष शिरोडकर यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषद दिली.
‘भारतीय तंत्रज्ञान संस्था’ ही सर्वोच्च शैक्षणिक संस्था आहे. ही संस्था एखाद्या गाव्यात असणे म्हणजे त्या गावचे भूषण आहे. केवळ गावचा विकासच नव्हे तर रोजगाराच्या असंख्य संधी देखील उपलब्ध झाल्या असत्या. मात्र, गोव्यात विविध भागात सद्या जो विरोध होत आहे तो अज्ञानातून असल्याचे श्री. शिरोडकर म्हणाले.
आज शिक्षणाला प्रचंड महत्व आहे हे कुणीच नाकारू शकत नाही. भारत देशाला शिक्षणाची फार मोठी परंपरा आहे. ही परंपरा कायम राहणार आहे. गोव्याने शिक्षण क्षेत्रात भरीव अशी कामगिरी केली आहे. धारबांदोडा तालुक्यात फॉरेन्सिक विद्यापीठ मिळाले आहे. हा गोव्याचा मोठे पणा आहे.
केजरीवाल यांनी दिशाभूल करू नये
दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात काहीच व्यवस्थित चालत नाही अशा पद्धतीचे चित्र उभे करून गोवेकरांची दिशाभूल करू नये असा सल्लाही सुभाष शिरोडकर यांनी दिला. दिल्लीत शैक्षणिक प्रगती झाल्याचा दावा अरविंद केजरीवाल करतात, अनेक सरकारी शाळा सुरू केल्याचे ते सांगतात. मात्र, दिल्लीत 15 ते 20 टक्के मुलांनी शाळेच्या पायऱया देखील चढलेल्या नाहीत. सुमारे 20 टक्के विद्यार्थी शाळा अर्ध्यावर सोडतात असा दावा सुभाष शिरोडकर यांनी केला.
आज दिल्लीतील जनता प्रदूषणामुळे हैराण झालेली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायलायाला देखील दखल घ्यावी लागली आहे. याकडे अरविंद केजरीवाल कसे काय दुर्लक्ष करतात असा सवाल श्री. शिरोडकर यांनी उपस्थित केला. सद्या गोव्यात निवडणूक असल्याने ते मतदारांची दिशाभूल करीत आहेत. निवडणुकीत ते विजयी होणार नाही हे सत्य आहे. त्यामुळे फेब्रुवारी पर्यंत ते आपले शेपूट बडवीत बसणार असल्याची टीका यावेळी केली. गोव्यातील हवामान स्वच्छ आहे ते प्रदूषित करण्याचा प्रयत्न अरविंद केजरीवाल यांनी करू नये. दिल्लीतील प्रदूषणामुळे जनतेला आणि देशाला आर्थिक फटका बसू लागला आहे. जनतेला आरोग्याच्या समस्या भेडसावू लागल्या आहेत. या प्रदूषणावर अगोदर त्यांनी उपाय योजना आखावी असा सल्ला ही दिला.