वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना व्हायरस महामारीच्या कारणास्तव यावर्षीची आयपीएल स्पर्धा रद्द करावी लागल्यास तब्बल 50 कोटी डॉलर्सहून अधिक रकमेचा फटका भारतीय मंडळाला बसणार आहे. मात्र खेळाडूंच्या मानधन कपातीबाबत अद्याप विचार करण्यात आलेला नसल्याचे एका वरिष्ठ पदाधिकाऱयाने सांगितले.
जगातील सर्वात श्रीमंत टी-20 लीग असलेली आयपीएल स्पर्धा बारा वर्षांत पहिल्यांदाच पूर्णतः रद्द होण्याच्या मार्गावर आहे. 29 मार्चपासून त्याची सुरुवात होणार होती. पण लॉकडाऊनमध्ये नंतर ती वारंवार लांबणीवर टाकण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. ही स्पर्धा होण्याबाबत अजूनही साशंकता असून ती रद्द करण्याचा निर्णय झाल्यास बीसीसीआयचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे. ‘आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला 4000 कोटी रुपयांचा (530 दशलक्ष डॉलर्स) किंवा त्याहून जास्त आर्थिक फटका बसणार आहे,’ असे बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल यांनी स्पष्ट केले. या स्पर्धेने बीसीसीआयला मोठय़ा प्रमाणात महसूल मिळत असून तो 11 अब्ज डॉलर्सहून अधिक असल्याचे म्हटले जाते. अनेक क्रिकेट मंडळांनी खेळाडूंच्या मानधनात कपात करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला खेळाडूंनीही मान्यता दिली आहे. मात्र नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर भारतीय खेळाडूंच्या मानधन कपातीचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.