किल्ला अशोक चौक-संगोळ्ळी रायण्णा चौकापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू : दिवसा पाईप घालण्याचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी
प्रतिनिधी / बेळगाव
किल्ला अशोक चौक ते संगोळ्ळी रायण्णा चौकापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. याकरिता पाईप घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी आरटीओ चौकात पाईप घालण्याचे काम सुरू करण्यात आल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली. चौकातच काम सुरू असल्याने मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होऊन न्यायालयापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. सध्या विविध रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. शहराचे प्रवेशद्वार असलेल्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. कॉलेज रोड, संगोळ्ळी रायण्णा रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, एस. पी. ऑफीस रोड, खानापूर रोड, क्लब रोड अशा प्रमुख मार्गांचे काँक्रिटीकरण झाले आहे.
किल्ला सम्राट अशोक चौक ते संगोळ्ळी रायण्णा चौकपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण अद्याप झाले नाही. सदर टप्प्यातील रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी स्मार्ट सिटीने आवश्यक तयारी चालविली आहे. दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असून, याकरिता आडव्या पाईप घालण्याचे काम सुरू आहे. हे काम दिवसा करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. सोमवारी सकाळी आरटीओ चौकात पाईप घालण्याचे काम सुरू करण्यात आले. त्याकरिता चौकातून रस्ता बंद ठेवण्यात आला. पण सोमवार हा आठवडय़ाचा पहिला दिवस असल्याने शहरात ये-जा करणाऱया नागरिकांची गर्दी मोठय़ा प्रमाणात असते.
त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ वाढली होती. अशातच खोदाईचे काम सुरू करण्यात आल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली. संगोळ्ळी रायण्णा चौकात तिन्ही बाजूच्या रस्त्यावरून येणाऱया वाहनांमुळे चौकात ट्राफिक जामचा अनुभव आला. येथून जाण्यासाठी रस्ता नसल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. संगोळ्ळी रायण्णा चौकापासून न्यायालयापर्यंत बस आणि अवजड वाहनांची रांग लागली होती. त्यामुळे नागरिकांना बराच वेळ अडकून पडावे लागले. आरटीओ चौकातून दुसरीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने वाहनधारकांची मोठी गोची झाली. सदर रस्ता बंद करण्याबाबत स्मार्ट सिटी कंपनीने कोणतीच अधिसूचना जाहीर केली नव्हती. या मार्गावरील वाहतूकदेखील वळविण्यात आली नव्हती. परिणामी वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना अडकून पडावे
लागले.
रस्त्याचे काम करताना वाहनधारकांना पूर्वकल्पना देण्यासह पर्यायी रस्ता उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. पण अयोग्य नियोजनामुळे वाहनधारकांना आणि नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. आरटीओ कार्यालयात तसेच अन्य ठिकाणी जाणाऱया नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय झाली. सदर रस्त्यावर पाईप घालण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. मात्र काँक्रिटीकरणास प्रारंभ झाल्यानंतर सलग महिनाभर वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीने आणि रहदारी पोलीस खात्याने आवश्यक उपाययोजना राबविण्याची गरज आहे. वाहनधारकांसाठी पर्यायी रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी होत आहे.