कारवाई न केल्यास काम बंद करण्याचा आशा कर्मचार्यांचा इशारा
प्रतिनिधी/कोल्हापूर
कोरोना विरोधातील लढयात जिल्हा प्रशासन, आरोग्य पथकाबरोबर आशा वर्कर गट प्रवर्तक आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. मात्र गेल्या आठ दिवसांपासून जिल्हयातील आशा आणि अंगणवाडी सेविका यांच्यावर हल्ले होण्याचे प्रकार वाढत आहेत. शाहूवाडी, चंदगड तालुक्यातील आशां या घरी चौकशीला गेल्यावर त्यांच्यावर हल्ले झाले आहेत. या बाबत प्रशासनाला कळवून सुध्दा प्रशासन आणि पोलिस हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत नाहीत, यामुळे आशा, गट प्रवर्तक,अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचारी भयभीत झाले आहेत.
कोरोना विरुध्दच्या लढाईत या आशा कर्मचारी शासनाच्या आदेशानुसार काम करत आहेत. मात्र त्यांना मागील महिन्याचे मानधन आणि घोषित वाढीव भत्ता ही मिळालेला नाही. तरीही त्या दैनंदिन कामात अजिबात कसूर करीत नाहीत. आज भुदरगड तालुक्यातील म्हसवे या गावात निता संजय काशिद या आशा वर्कर व एका अंगणवाडी सेविका यांच्यावर सुरेश गणपती तांबेकर आणि त्याचा मुलगा शेखर सुरेश तांबूल यांनी सदर आशा वर्कर यांना घरात चौकशी करीत असताना घराबाहेर ओढत आणत मारहाण करत अर्वाच्य शिवीगाळ केली. तांबेकर यांच्या घरामध्ये कागल तालुक्यातील बाणगे या गावातून एक महिला आणि दोन लहान मुले आल्याचे शेजारच्या लोकांनी आरोग्य विभागाला कळविले होते. त्यामुळे आरोग्य विभागाचे पथकच चौकशी ला गेले असता हा प्रकार घडला आहे.
यावर सीटुच्या वतीने तांबेकर पिता पुत्राना ताबडतोब अटक करून 14 दिवस अलगीकरणात ठेवावे व जिल्हयातील प्रत्येक गावातील आरोग्य पथक आणि विशेषतः आशा वर्कर, गट प्रवर्तक आणि अंगणवाडी सेविका यांना पोलीस संरक्षण द्यावे, याबाबत जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुख आणि मंत्री महोदय यांनी संबंधितांवर ताबडतोब दोन दिवसांत कारवाई करावी अशी मागणी सिटूचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे, आशा वर्कर्स फेडरेशन च्या जिल्हाध्यक्षा नेत्रदीपा पाटील यांनी केली आहे