प्रतिनिधी/ रत्नागिरी
इंजिनिअरिंग प्रवेशासाठी बारावीच्या किमान गुणांची अट 5 टक्क्यांनी शिथिल करण्यात आली आहे. यामुळे सीईटीमध्ये किमान 1 गुण आणि बारावीला किमान 45 टक्के गुण मिळणाऱया विद्यार्थ्यालाही प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
इंजिनिअरिंग पदवी शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र तसेच गणित (पीसीएम) या 3 विषयांमध्ये किमान 45 टक्के गुण तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 40 टक्के गुण मिळवणे आवश्यक असणार आहे. यापूर्वी ही अट अनुक्रमे 50 व 45 टक्के इतकी होती. नव्या निकषांनुसार 5 टक्क्यांची अधिक सवलत देण्यात आली आहे. इंजिनिअरिंग तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश कसे करायचे, या बाबतचे राजपत्र राज्य सरकारने प्रसिद्ध केले आहे. कर्नाटकसह इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही ही अट शिथिल करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. मात्र गुणवत्तेचा विचार करत ती मान्य केली जात नव्हती. इंज्ग्नानिअरिंगसोबतच औषध निर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट, विधी 5 वर्षे अभ्यासक्रम, बॅचलर इन फाईन आर्ट या अभ्यासक्रमांसाठीचे बारावीच्या किमान गुणांची अट ही 50 व 45 टक्क्यांवरून अनुक्रमे 45 व 40 टक्के अशी करण्यात आली आहे. यामुळे कमी गुण मिळालेले विद्यार्थी कर्नाटकला प्रवेश घेण्यासाठी जातात. ते तेथे न जाता आपल्या राज्यात प्रवेश घेतील, अशी अपेक्षा उदय सामंत यांनी व्यक्त केली.
‘उमेद’मधून एकाही कर्मचाऱयाला कमी केले जाणार नाही
उमेद अंतर्गत काम करणाऱया अधिकारी, कर्मचाऱयांची सेवा समाप्त करण्याबाबत कोणताही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही. कर्मचाऱयांमध्ये कोणतरी गैरसमज पसरवत आहे. ‘उमेद’मधून एकाही कर्मचाऱयाला कमी केले जाणार नाही. तर उमेदसाठी 100 कोटी गुंतवणुकीची बँक भविष्यात सुरु होणार आहे. तसा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर केवळ अधिकारी, कर्मचाऱयांचे पगार करणारी संस्था बदलली आहे. मात्र त्याचा कोणताही परिणाम कर्मचाऱयांच्या पगारावर होणार नाही. राज्यातील 2859 कर्मचारी आहेत तेथेच राहणार असल्याचे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.
जप्त औषधसाठा चौकशीसाठी समिती गठीत
रत्नागिरी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांच्या सूचनेवरुन जप्त केलेल्या औषधसाठय़ाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी यांनी प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. त्या समितीत सदस्य म्हणून जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त, लेखाधिकारी (जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासन विभाग) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयाने तो साठा आपण मागवला नसल्याचे सांगितल्याने संबंधित साठा घेवून येणाऱया वाहतूकदारांची चौकशी ही समिती करणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.