सुशांत कुरंगी / बेळगाव
एम. एस. पर्यंतचे शिक्षण घेऊन पुण्यातील नामवंत कंपनीत काम केल्यानंतरही शेतीशी असणारी त्यांची नाळ अजूनही जोडलेली होती. मोठय़ा शहरांमध्ये पैसा, प्रति÷ा आहे पण मनाला मिळणारी शांती नसल्याने त्यांनी थेट बेळगाव गाठले आणि भावाच्या 13 गुंठे शेतात गो-पालन करण्याचा निर्णय घेतला. आपल्या इंजिनिअरिंगपर्यंतच्या शिक्षणाचा वापर देशी गाईंचा सांभाळ करण्यासाठीही केला. इतक्मयावरच न थांबता या गाईंच्या दुधापासून तयार झालेली उत्पादने त्यांनी ऑनलाईन विक्री करण्यास सुरुवात केली. वर्षानुवर्षे तोटय़ाचा समजला जाणारा गो-पालन व्यवसाय त्यांनी फायद्याचा करून दाखविला आहे.
लक्ष्मीनगर येथील सुजित हुक्केरीकर यांनी गो-पालन करून बेरोजगार तरुणांना एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. घरबसल्या सॉफ्टवेअरचे काम करता करता ते गो-पालनही करीत आहेत. मागील 10 वर्षांमध्ये त्यांनी देशी गायी पाळून त्यांचे संगोपन केले आहे. सुरुवातीला त्यांना अनेक अडचणी आल्या, परंतु त्यावर त्यांनी यशस्वी मात केली आहे. सध्या त्यांच्याकडे 10 गायी व त्यांची वासरे आहेत. चांगल्या दर्जाचे दूध व इतर उपपदार्थ असतील तर तुम्हाला लोकांकडे जाण्याची आवश्यकता नाही. लोक स्वत:हून तुमच्याकडे खरेदीसाठी येतात, हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे.
अवघ्या 13 गुंठय़ात फायद्याचे गो-पालन
सुजित यांनी आपले भाऊ प्रदीप व प्रवीण कलकुप्पी यांच्या मदतीने गांधीनगरजवळ 13 गुंठे जागेत देशी गो-पालन करण्याचे ठरविले. पहिल्यांदा तितकीशी माहिती नसल्याने चुकाही झाल्या. परंतु जसजशी माहिती होत गेली तसतसे विविध जातींच्या गायी त्यांनी आणल्या. देशी गायींमध्ये खिलार, जवारी, गीर, रेडसिंद, सैवाल या गायी त्यांच्याकडे आहेत. गीर गायीला विशेष मागणी असल्याने त्यांनी त्याकडे जास्त लक्ष पुरविले.
फक्त गायीच्या दुधावर विसंबून नको
आपल्या देशात शेतकरी फक्त जनावरांच्या दुधावर विसंबून असल्याने हा व्यवसाय तोटय़ाचा होत असतो. परंतु गायीच्या सर्व उपपदार्थांचा वापर केल्यास हेच गो-पालन फायद्याचे ठरू शकते. गायीच्या दुधाबरोबरच गोमूत्र, अग्निहोत्रासाठीच्या शेणी, शेणखत, गांडूळ खत, तूप याला मोठी मागणी असल्याने याची विक्री शेतकऱयांसाठी एक जोडधंदा ठरत असल्याचे सुजित यांनी दाखवून दिले आहे.
प्राण्यांच्या वर्गीकरणासाठी ऍपची निर्मिती
देशी गायींचे जतन व संगोपन योग्य पद्धतीने व्हावे याकरिता सुजित हुक्केरीकर व प्रसाद देसाई यांनी एकत्रित एक ऍप्लिकेशन तयार केले आहे. सध्या हे प्रायोगिक तत्त्वावर असून जनावरांबाबतची डिजिटल ओळख व्हावी याकरिता काम करीत आहेत. सरकारकडून जनावरांच्या कानावर टॅग लावून माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु तो टॅग बदलण्याचे प्रमाण वाढल्याने विमा कंपन्याही नुकसानभरपाई देण्यास तयार नसतात. यामध्ये शेतकऱयांचे नुकसान होत असून ते दूर करण्यासाठी या ऍपद्वारे संशोधन करण्यात येत आहे.
संशोधनाची राष्ट्रीय पातळीवर दखल
डिजिटल आयडेंटिटी फॉर ऍनिमल यावर त्यांचे संशोधन सुरू आहे. ज्या प्रकारे आधारकार्ड व्यक्तीची सर्व माहिती देते त्याच प्रकारची व्यवस्था त्यांनी प्राण्यांमध्ये केली आहे. ऍनिमल हसबंडरी स्टार्टअप ग्रॅंड चॅलेंज या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये सुजित व प्रसाद यांच्या संशोधनाला पहिला क्रमांक मिळाला आहे. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांनी या पुरस्काराचे वितरण केले. हे संशोधन प्रत्यक्षात शेतकऱयांपर्यंत पोहोचल्यास त्याचा फायदा शेतकऱयांना जनावरे पालनासाठी होणार आहे.