देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय स्तरावर वाहतूक 30 टक्क्यांवर- नोकरकपात नाही
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर इंडिगोची अनुक्रमे 40, 30 टक्के इतकी विमाने सध्याला कार्यरत आहेत. तरीही याही काळात कंपनीने नोकरकपात करणार नसल्याचे म्हटले आहे. 2022 च्या दुसऱया तिमाहीत कोरोनापूर्व परिस्थिती बहाल होईल, अशी आशा हवाई क्षेत्रातील कंपनी इंडिगोने व्यक्त केली आहे.
सध्याची परिस्थिती पाहता सर्व सुरळीत होण्यासाठी आणखी काही कालावधी जावा लागेल. एकंदर कोरोना रुग्णसंख्येत घट होत असून 2022 मध्ये खऱया अर्थाने हवाई उद्योगाला सूर गवसेल, अशी आशा कंपनीचे सीईओ रोनोजॉय दत्ता यांनी व्यक्त केली आहे. सध्या देशात 40 टक्के आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 30 टक्के इतकीच विमान वाहतूक करण्यात येत आहे. कोरोनाच्या लाटेमुळे विमानांच्या फेऱयांवर विपरीत परिणाम झाला आहे.
मागच्या वर्षी जुलैमध्ये देशातील सर्वात मोठी कंपनी असणाऱया इंडिगो यांनी 10 टक्के कर्मचारी कपात केली होती. आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर कंपनीला सदरचा निर्णय घ्यावा लागला होता. देशात दुसरी कोरोना लाट येण्यापूर्वी फेब्रुवारीत इंडिगोनेएकूण क्षमतेपैकी 80 टक्के देशांतर्गत विमान सेवा सुरू ठेवली होती. कोरोना सुरू होण्यापूर्वी कंपनीची रोज दिवसाला 1500 विमाने सेवा बजावत होती. पण त्यानंतर एप्रिल आणि मेमध्ये विमानांच्या संख्येत लक्षणीय घट झाली जी 400 पर्यंत घसरल्याचे सीईओ दत्ता यांनी सांगितले. 18 मे ते 6 जून या कालावधीत विमान फेऱयांची संख्या वाढलेली दिसली. गेल्या एक ते दीड वर्षाच्या कालावधीत टायर टू आणि टायर थ्री शहरांमध्ये विमानसेवा अधिक बळकट झालेली पाहायला मिळाली आहे. 45 टक्के इतका वाटा या शहरांनी विमान सेवेत उचलला असल्याचेही त्यांनी सांगितले.