व्हर्चुअल बैठकीत करणार भाषण, संबंध होणार दृढ
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
पुढील आठवडय़ात येथे ‘इंडिया आयडिया’ कार्यक्रम व्हर्चुअल पद्धतीने होणार आहे. या कार्यक्रमात अमेरिकेचे विदेश व्यवहार मंत्री माईक पाँपिओ उपस्थित राहणार असून भाषणही करणार आहेत. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामनही भाषण करणार आहेत.
लडाखमध्ये चीनने दाखविलेली आक्रमकता आणि कोरोना विषाणूचा चीननेच प्रसार केला हा आरोप या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याने तिचे महत्व मोठे आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात सर्व आघाडय़ांवर बळकट संबंध प्रस्थापित करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
21 जुलैला या बैठकीचा प्रारंभ अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रमुख कार्यकारी अधिकारी थॉमस डोनोहय़ू यांचे उद्घाटनपर भाषण होणार आहे. नंतर 22 जुलैला जयशंकर आणि सिनेटर माईक वॉर्नर हे ‘कोरोना नंतरच्या जगात भारत आणि अमेरिका कशा प्रकारे जगाचे नेतृत्व करतील’ या विषयावरील चर्चेत सहभागी होणार आहेत. या परिसंवादानंतर पाँपिओ यांचे भाषण होणार आहे.
नंतर कोरोनानंतरच्या काळात भारत-अमेरिका संबंधांचे भवितव्य या विषयावर अमेरिकेचे भारतातील राजदूत केनेथ जस्टर आणि भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजितसिंग संधू यांच्यात चर्चा होणार आहे.
औषधांचे जागतिक भांडार
भारत हे औषधांचे जागतिक भांडार आहे. कोरोनानंतरच्या काळात भारताचे हे महत्व वाढणार आहे. यासंबंधातही अमेरिकेशी सहकार्य वाढविण्याचा भारताचा विचार आहे. सध्या औषधांच्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर चीनची जवळपास एकाधिकाशाही चालते. ही परिस्थिती बदलण्याच्या प्रयत्नात भारताची भूमिका महत्वाची राहील. अमेरिकेलाही या क्षेत्रात भारताशी निकटचे सहकार्य करायचे आहे, असे भारताच्या अनेक अधिकाऱयांनी पत्रकारांकडे स्पष्ट केले.
तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य
अमेरिकेच्या सोबतीने भारत उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेऊ इच्छितो. 5 जी क्षेत्र, संरक्षण क्षेत्र, त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन, ऊर्जा निर्मितीसाठी लागणारी साधने इत्यादी क्षेत्रांमध्ये भारताला अमेरिकेचे सहकार्य अपेक्षित आहे. या बैठकीतील चर्चांमधून हे सहकार्य अधिक दृढ होईल असा विश्वास व्यक्त होत आहे, अशी प्रतिक्रिया भारत व अमेरिका यांच्यातील सत्तावर्तुळातून येत आहे.