पायलट नवा पक्ष काढण्याच्या तयारीत, परतण्याची अंतिम संधी देण्यास काँगेस तयार
जयपूर / वृत्तसंस्था
राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरूद्ध उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील गटबाजी शिगेला पोहचली असून दोन्ही बाजू आपापल्या म्हणण्यांवर अद्यापी ठाम असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राजकीय अस्थिरतेचे सावटही कायम आहे. गेहलोत यांनी काँगेसच्या विधिमंडळ पक्षाने पूर्ण पाठिंबा व्यक्त केला. मात्र या बैठकीवर पायलट यांच्या समर्थक आमदारांनी बहिष्कार टाकला होता.
दोन्ही बाजू आपल्याकडे पुरेसे आमदार असल्याचा दावा करीत आहेत. गेहलोत यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या सरकारला एकंदर 106 आमदारांचे समर्थन असून सरकारला कोणताही धोका नाही. तथापि, पायलट यांनी दिल्लीतून गेहलोत यांचा दावा खोटा असल्याचे म्हटले. आपल्याला काँगेसच्या 30 आमदारांचे समर्थन असून त्यापैकी 25 आमदार सध्या आपल्यासह दिल्लीत आहेत. आणखी काही अपक्षही आमच्यासोबत आहेत, असा रविवारचा दावा सोमवारी त्यांनी पुन्हा केला.
पायलट यांना शेवटची संधी
पायलट यांना काँगेस शेवटची संधी द्यावयास तयार आहे. मात्र, त्यांनी बंड मागे घेऊन सरकारसोबत राहिले पाहिजे. त्यांच्या ज्या अडचणी असतील त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. मात्र बंडखोरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा काँगेस प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी दिला.
पायलट नवा पक्ष काढणार ?
आपला भाजपमध्ये जाण्याचा विचार नाही. मात्र काँगेसमध्येही अवमान खपवून घेणार नाही, अशी प्रतिक्रिया पायलट यांनी व्यक्ती केली. सोमवारी जयपूर येथे झालेल्या काँगेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर संमत करण्यात आलेल्या प्रस्तावात पायलट यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करण्यात आली होती. पक्ष कमजोर करणाऱया प्रत्येक नेत्याचा आणि प्रयत्नांचा आम्ही निषेध करतो, असे प्रस्तावात नमूद आहे. त्यामुळे पायलट यांना शेवटची संधी देण्याची भाषा काँगेस नेतृत्व करीत असले तरी त्यांना यापुढे पक्षात फारसे महत्व दिले जाणार नाही, असे दिसून येते. त्यामुळे पायलट आणि काँगेस यांच्यात न भरून येणारी दरी निर्माण झाल्याचीही चर्चा आहे. एकंदर, पायलट पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.
छायाचित्रांमधून वातावरणनिर्मिती
पायलट जनतेच्या हितासाठी किती प्रयत्न करीत आहेत, हे दर्शविणारी काही छायाचित्रे पायलट यांच्या समर्थन मंत्र्याने प्रसिद्ध केली आहेत. या छायाचित्रांमधून पायलट जनतेच्या अधिकारांसाठी आंदोलन करताना जखमी झालेले दिसत आहेत. यातून त्यांच्या बाजूने वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न होत आहे. पायलट यांनी काँगेसपासून काडीमोड घेण्याचा निर्धार केल्याचे दिसते, असे तज्ञांचे मत आहे.
गेहलोत समर्थक रिझॉर्टमध्ये
कर्नाटक आणि मध्यप्रदेशप्रमाणे आता राजस्थानातही रिझॉर्ट राजकारण सुरू झाले आहे. विधीमंडळ पक्षाची बैठक आटोपताच सोमवारी दुपारी दीड वाजता सर्व गेहलोत समर्थक आमदारांची पाठवणी रिझॉर्टमध्ये करण्यात आली. गेहलोत बहुमताचा दावा करतात. मग ते आपल्या आमदारांना लपवत का आहेत, असा प्रतिप्रश्न पायलट गटाने विचारला आहे. मुख्यमंत्र्यांनी बहुमत गमावले असून त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असाही दावा या गटाकडून केला गेला.
राहुल गांधींमुळेच नष्टचर्य
राहुल गांधी आपल्याच पक्षातील तरूण नेत्यांचा दुस्वास करतात. या तरूण नेत्यांची त्यांना स्पर्धा वाटते. त्यामुळे ते अशा तरूणांना पुढे येऊ न देता त्यांची गळचेपी करतात. यामुळेच मध्यप्रदेशप्रमाणे राजस्थानातही काँगेससमोर संकट आहे. काँगेसच्या विनाशाला राहुल गांधीच जबाबदार आहेत, अशी टीका भाजप नेत्या आणि मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी केली.
दोन दिवसांमध्ये चित्र स्पष्ट
राजस्थानात दोन्ही गटांचे बळ किती, सरकार जाणार की राहणार, पायलट पक्षात राहणार की जाणार, पायटल पुढे स्वतंत्र पक्ष काढणार की भाजपमध्ये जाणार या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या दोन दिवसांमध्ये मिळून चित्र स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया अनेक राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.