मुंबई / वृत्तसंस्था
‘टाटा सन्स’च्यावतीने तुर्की एअरलाईन्सचे माजी सीईओ इल्कर आयसी यांची एअर इंडियाचे नवीन एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एअर इंडियाच्या सोमवारी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष एन चंद्रशेखरन बोर्डाच्या बैठकीत विशेष निमंत्रित अतिथी होते. टाटा समूहाने एअर इंडियामध्ये 100 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. या ग्रुपकडे आता तीन एअरलाईन्स आहेत. टाटा समूह एअर इंडियाचे विद्यमान कर्मचारी देखील कायम ठेवणार आहे. एअरलाईन्समधील कर्मचारी संख्या सुमारे 8,500 इतकी आहे. केंद्र सरकारशी झालेल्या करारानुसार टाटा सन्सकडून एअर इंडियाला कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
एअर इंडिया ही आता अधिकृतरित्या टाटा समूहाची कंपनी झाली आहे. मागील महिन्याच्या अखेरीस पूर्ण झालेल्या कागदोपत्री प्रक्रियेनंतर आता एअर इंडिया एक्स्प्रेस या कंपनीचेही हस्तांतरण झाले आहे. केंद्र सरकारने या कंपन्यांमधील आपले 100 टक्के समभाग टाटा उद्योगसमूहाच्या स्वामित्वातील उपकंपनी टालेसी प्रायव्हेट लिमिटेडकडे हस्तांतरित केले आहेत. तसेच कंपनीचे संपूर्ण व्यवस्थापकीय नियंत्रणही टाटांकडे देण्यात आले आहे. अर्थातच भारतासह जगात प्रसिद्ध असलेला ‘महाराजा’ आता पुन्हा टाटांकडे गेला आहे.